संग्राम काटकर / कोल्हापूर
साकोली कॉर्नर (शिवाजी पेठ) जवान अभिजीत सूर्यवंशी यांनी देशाच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या घटनेला शनिवारी (दि. 26) 20 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने त्यांनी दिलेले बलिदान आणि त्यांच्या स्मरणार्थ केल्या जाणाऱ्या कार्याचा आढावा असा.
ख्रिसमसचा दिवस होता. या दिवशी जम्मू-काश्मीरमधील बटवारा गावातील भारतीय लष्करी कार्यालयात 200 लष्करी अधिकाऱयांची बैठक होती. थेट बैठकीत घुसून अधिकाऱ्यांना मारण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता. त्याच्या सोबत आरडीएक्सने भरलेली चारचाकी गाडीही होती. ही गाडी गेटवरून कार्यालयात शिरत असताना तिला कोल्हापूरचे जाँबाज जवान अभिजीत सूर्यवंशी यांनी अडवले. याचवेळी चालून आलेल्या एका दहशतवाद्याला अभिजीत यांनी लाथ मारून इतर जवानांना सावध केले. मात्र याचवेळी दहशतवाद्यांनी आरडीएक्ससचा अचानक स्फोट केला. यात गंभीर जखमी झालेले अभिजीत 26 डिसेंबरला गतप्राण झाल्याची वार्ता कळली आणि सारं कोल्हापूरच सुन्न झालं. आज या घटनेला वीस वर्षे झाली. पण अभिजीत यांनी लष्करी अधिकाऱ्यांचे प्राण वाचवत दिलेले बलिदान कोल्हापूरकरांच्या आजही स्मरणात आहे. अंत्ययात्रेला तर हजारो लोक जणू आपला मित्र धारातीर्थी पडल्याचे समजून आले होते.
अभिजीत यांच स्मरण कायमस्वरूपी राहो, यासाठी वडील वीरपिता मदनराव आणि वीरमाता मनीषा सूर्यवंशी यांनी शहिदवीर अभिजीत म. सूर्यवंशी ट्रस्ट 2001 साली स्थापन केला. त्याच अध्यक्षपद वीरमाता मनिषा सूर्यवंशी यांनाचं दिलं. त्यांनी सैन्यदलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानाचा `बेस्ट जवान ऑफ दी इयर’ हा पुरस्कार आणि आजी-माजी सैनिकांच्या मुलां-मुलींना शिष्यवृत्ती देण्याची संकल्पना मांडली. ती अस्तित्वात आणण्यासाठी शासनाने दिलेली आर्थिक मदतच वापरण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसारच प्रत्येक 26 डिसेंबरला एका जवानाचा ‘बेस्ट जवान ऑफ दी इयर’ या पुरस्काराने सन्मान आणि आजी-माजी सैनिकांच्या मुलामुलींना शिष्यवृत्ती असा कार्यक्रम आयोजित केला जात आहे.
गेल्या 19 वर्षात सैन्यदलासाठी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 19 जवानांचा पुरस्कार करण्याबरोबरच 748 मुला-मुलींना हजारो रुपयांची शिष्यवृत्ती लष्करी अधिकाऱ्यांच्या हस्तेच देऊन त्यांचा सन्मान केला आहे. ट्रस्टची गरीब कुठूंबातील रूग्णांनाही व्हावी म्हणून प्रत्येक 26 डिसेंबरला रक्तदान शिबिरही आयोजित केले जाते. आजवर सहाशेवर रक्त बाटल्यांचे संकलन करून त्या सीपीआर, शाहू बल्ड बँकेला दिल्या आहेत. वयोमानानुसार वीरमाता मनिषा सूर्यवंशी यांना ट्रस्टचे कामकाज पाहणे जमत नसल्याने कार्याध्यक्ष नितीन (अभिजीत यांचे भाऊ) हेच ट्रस्ट सांभाळत आहेत. त्यांनी गतवर्षी वीरपत्नी रतन चव्हाण (रा. उमा चित्रमंदिर) यांना ट्रस्टतर्फे 5 हजार रुपयांची मदत देत ट्रस्ट तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. चव्हाण यांच्या पतीदेवांनी दुसऱ्या महायुद्धात लढाई केली होती. त्याची आठवण ठेवून चव्हाण यांना आर्थिक मदतीचा हात नितीन यांनी दिला होता.
तरूणांनो गुंडगिरी करू नका…
देशासाठी दिलेल्या बलिदानाबद्दल सैन्यदलाने अभिजीत यांच्या कुटुंबाला एक प्रमाणपत्र दिले आहे. `तुमच्या भविष्यासाठी सैनिकांने आज बलिदान दिले आहे’ असे देशाला उद्देशून लिहिलेले हे वाक्य प्रमाणपत्रावर आहे. तेव्हा या वाक्यातून बोध घेऊन तरूणांनी गुंडगिरी करत आयुष्य बरदार करण्यापेक्षा आपलं घर, गाव, राज्यासह देशाच्या भल्यासाठी काय करता येईल, याचा नेहमी विचार करावा. तसंच गेल्याच महिन्यात शत्रुशी लढताना बहीरेवाडी येथील ऋषीकेश जोंधळे व निगवे खालसाच्या येथील संग्राम पाटील यांनी दिलेले बलिदानाचा विसर पडू न देता समाजाने त्यांच्या कुठूंबाचे आधार बनावे, असे आवाहन वीरमाता मनिषा सूर्यवंशी केले आहे.