सातारा / प्रतिनिधी :
दहशतवादी कसाबला जीवंत पकडणारे हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी विद्यमान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी 5 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यास आमचा विरोध आहे, अशा शब्दात आमदार शिवेंद्रराजेंनी मंत्री मुश्रिफ यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत ठरल्याप्रमाणे दहा कोटी रुपये देवून स्मारकांचे काम झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. तसेच सातारा पालिकेनेही हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाचे काम केले नसल्याची सांगितले.
सुरुची निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजे म्हणाले, जावली तालुक्यातील केंडबे गावचे सुपूत्र हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे स्मारक होण्यासाठी बैठका घेतल्या होत्या. प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाली. स्मारकासाठी जागा दाखवण्यात आली. त्या जागेत देवस्थान ट्रस्ट असल्याने परवानग्यासाठी वेग लागला असल्याने काम सुरु होवू शकले नाही. असे असताना नुकतेच राज्याचे गृहराज्यमंत्री हसन मुश्रिफ यांनी त्या स्मारकाला पाच कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी या स्मारकाला दहा कोटींचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्मारकाबरोबर केंडबे या गावात सुविधा देण्याचाही त्यामध्ये समावेश होता. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे स्मारक झाले पाहिजे यात शंका नाही. परंतु, 10 कोटीवरुन 5 कोटीचे स्मारक केले जाणार असेल, तर या गोष्टीला आम्ही विरोध करणार आहे.
ठरल्याप्रमाणे दहा कोटी देवून या स्मारकाचे काम लवकरात लवकर करावे. जिल्हा प्रशासनाकडून जागा मिळवून देण्याबाबत दिरंगाई होत आहे, ती लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांना साताऱ्यातील हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या स्मारकाबाबत छेडले असता ते म्हणाले, त्या स्मारकाबाबत सातारा पालिकेकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. साधा कागद हलला नाही. जागा फायनल नाही. जनरल बॉडीला ठराव किंवा त्याला लागणारी तरतूद अशा कोणत्याही गोष्टी सातारा नगरपालिकेमध्ये झालेल्या दिसत नाहीत, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँक सक्षम
ईडीच्या नोटीसीबाबत आमदार शिवेंद्रराजेंना विचारले असता ते म्हणाले, सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वर कारखान्याला कर्ज पुरवठा नियमानुसार केलेला आहे. फायनान्स देत असताना सर्व नियमांचे पालन करुन दिलेला आहे. ईडीने नोटीस पाठवलेली नाही तर जरंडेश्वर कारखान्यास कर्ज पुरवठा केल्याची माहिती मागवली आहे. ती माहिती दिलेल्या तारखेला पोहचेल. रिझर्व्ह बँक, नाबार्ड यांच्या निकषानुसार जिल्हा बँक काम करत असून, दिलेला फायनान्स सेफ आहे. त्याची वसुली ही वेळच्यावेळी होत आहे. त्यामुळे कोणतीही चिंता असायचे कारण नाही, असेही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रराजे यांनी सांगितले.