प्रतिनिधी / बेळगाव
सीमाभागात 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो. या दिवशी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सीमावासियांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जत्तीमठ येथे बुधवारी झालेल्या शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे होते.
या दिवशी सकाळी 8 वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. हुतात्म्यांनी दिलेल्या त्यागाची आठवण करून देण्यासाठी हुतात्मा दिनी सीमावासियांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे विचार उपस्थित शहर समितीच्या पदाधिकाऱयांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
हुतात्मा दिनी शुक्रवार दि. 17 रोजी उपस्थित राहून बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करणे प्रत्येक सीमावासियाचे कर्तव्य आहे, असे विचार माजी महापौर सरिता पाटील यांनी मांडले.
आमचा लढा शांततेत चालू असून आपल्याला ध्येय गाठायचे आहे. बाहेरून येणारे लोक शहराची शांतता भंग करत आहेत. मराठी माणसाला डिवचणे हाच त्यांचा उद्देश असून याकडे दुर्लक्ष करून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी केले.
सीमालढय़ातील हुतात्म्यांचे योगदान विसरून चालणार नाही. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असला तरी सीमावासियांची तळमळ कायम आहे. हुतात्मा दिन अतिशय गांभीर्याने आणि शिस्तबद्धरीत्या व्हावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. हुतात्मा दिनी अभिवादन करून सीमालढय़ाला प्रेरणा देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे विचार माजी नगरसेवक पंढरी परब यांनी व्यक्त केले.
सीमालढय़ाविषयी तरुणांना अधिक माहिती नाही. त्यामुळे लोकजागृती करून तरुणांना सीमाप्रश्न धगधगता ठेवण्याविषयी पेरणा देऊ या, असे विचार किरण गावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. तसेच नेताजी जाधव यांचेही भाषण झाले.
बैठकीला मराठा बॅँकेचे बाळासाहेब काकतकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, द्वारकानाथ उरणकर, सागर पवार, कल्लाप्पा पाटील, परशराम कोकितकर, लक्ष्मण गोजगेकर, मिथिल जाधव, मोमेरा बारदेशकर, रूपा नावगेकर, शांता मेलगे, अंकुश केसरकर, व्यंकटेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.