राष्ट्रपती भवनात वीरपत्नी राणी जाधव यांच्याकडून स्वीकार : पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर /निपाणी
जम्मू-काश्मीर येथील अनंतनाग जिल्हय़ात अतिरेक्यांशी लढताना बुदिहाळ (ता. निपाणी) येथील जवान प्रकाश पुंडलिक जाधव यांना 27 नोव्हेंबर 2018 रोजी वीरमरण प्राप्त आले होते. तत्पूर्वी त्यांनी 2 अतिरेक्यांचा खात्मा करताना आपल्या सहकाऱयांना जीवदान दिले होते. या शौर्याचे प्रतिक म्हणून गतवर्षी शांतता काळात देण्यात येणारा दुसरा सर्वोच्च साहसी पुरस्कार असणारे कीर्तिचक्र (मरणोत्तर) जाहीर करण्यात आले होते. सोमवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या एका सोहळय़ात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते वीरपत्नी राणी जाधव व वीरमाता शारदा जाधव यांना सदर कीर्तिचक्र प्रदान करण्यात आले.
निपाणीपासून 5 कि. मी. अंतरावर असणाऱया बुदिहाळ या छोटय़ाशा गावातील जवान प्रकाश जाधव यांना जम्मू-काश्मीर येथे वीरमरण प्राप्त झाले होते. देशासाठी लढताना आणि आपल्या सहकारी जवानांना वाचविताना मोठय़ा धैर्याने त्यांनी 2 अतिरेक्यांचा खात्मा करताना देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. 3 वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेने निपाणी तालुक्यासह संपूर्ण बेळगाव जिल्हा शोकसागरात बुडाला होता. पण सैन्यदलातील निवृत्त जवान पुंडलिक जाधव हे आपले वडीलपण सार्थपणे पार पाडताना वीरपत्नी, वीरमाता, वीरकन्या यांच्यासह सर्वांनाच आधार देत आहेत.
आठवणींना उजाळा
प्रकाश जाधव यांनी वीरत्व स्वीकारल्यापासून परिसरातील युवकांमध्ये सैन्यदलात भरती होण्याची व देशासाठी लढण्याची उमेद वाढल्याचे सैन्यभरतीसाठी जाणाऱया संख्येतून स्पष्ट होत आहे. अशा या परिस्थितीत जाहीर करण्यात आलेले कीर्तिचक्र वीरपत्नी व वीरमाता यांना प्रदान करण्यात आले. हे वृत्त समजताच अनेकांनी वीरजवान प्रकाश जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर अनेकांनी सामाजिक माध्यमांतून हुतात्मा प्रकाश जाधव यांना मानवंदना दिली. नवी दिल्ली येथे झालेल्या या सोहळय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सीडीएस बिपीन रावत, जनरल एम. एम. नरवणे, तिन्ही सेनादलाचे प्रमुख, केंद्रीय मंत्री उपस्थित होते.