म. ए. समितीकडून हुतात्म्यांना अभिवादन : कोरोना नियमावलीचे पालन करत हुतात्मादिन गांभीर्याने
प्रतिनिधी /बेळगाव
भाषावार प्रांतरचना झाली आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांनी आकाशवाणीवरून भाषावार प्रांतरचनेची माहिती दिली. मुंबई प्रांतातील मराठीबहुल भाग म्हैसूर प्रांताला जोडण्यात आल्याचे समजताच सीमावासियांमधून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. संताप व्यक्त करण्यासाठी 17 जानेवारी 1956 रोजी सीमावासीय रस्त्यावर उतरले आणि गोळीबार सुरू झाला. यामध्ये सीमाभागातील अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले. या हुतात्म्यांना सोमवारी सकाळी हुतात्मा चौक येथे अभिवादन करण्यात आले. कोरोना नियमावलीचे पालन करत मराठी भाषिकांनी गांभीर्याने हुतात्म्यांना अभिवादन केले.
शहर महाराष्ट्र एकीकरण समिती, महिला आघाडी, युवा समिती, शिवसेना यांच्यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. पुष्पहार घालून हुतात्म्यांचे स्मरण करण्यात आले. कोरोना नियमावलीमुळे तसेच भाई एन. डी. पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला.
मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले, मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी आमचा लढा सुरू आहे. या लढय़ामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांनी सांडलेले रक्त हे आमच्यासाठी प्रेरणा देणारे आहे. अनेक अडचणी समोर आहेत. परंतु हुतात्म्यांचे हे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. सीमाप्रश्नाची सोडवणूक करणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी हुतात्मा चौक येथे पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. यानंतर अभिवादन फेरी काढण्यात आली. कोरोना नियमावलीचे पालन करत मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अभिवादन फेरी काढण्यात आली. हुतात्मा चौक, अनसूरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे पुन्हा हुतात्मा चौक अशी फेरी काढण्यात आली.
अनसूरकर गल्ली येथे हौतात्म्य पत्करलेल्या मधू बांदेकर यांच्या प्रतिमेला रोमा ठाकुर व वैशाली भातकांडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. किर्लोस्कर रोड येथील हुतात्म्यांना नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी पुष्पहार अर्पण केला.