पाठपुरावा करूनही बँक-महाराष्ट्रातील अधिकाऱयांकडून ठोस माहिती मिळत नसल्याने नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
सीमाप्रश्नासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या सीमासत्याग्रहींच्या वारसांना पेन्शनसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. मागील वर्षभरापासून हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नीची पेन्शन बंद असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नेमकी पेन्शन का बंद झाली, याबद्दल पाठपुरावा करूनही बँक व महाराष्ट्रातील अधिकाऱयांकडून ठोस माहिती मिळत नसल्याने वारसांकडून नाराजी व्यक्त होत
आहे.
1956 मध्ये हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर, नागाप्पा होसूरकर व महादेव बारागडी यांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारकडून पेन्शन सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याला त्यांच्या वारसांच्या खात्यामध्ये पेन्शन जमा केली जाते. त्याचसोबत 1986 च्या लढय़ातील हुतात्म्यांच्या वारसांनाही पेन्शन दिली जाते.
परंतु यातील मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नीच्या नावे येणारी पेन्शन अचानक बंद झाली. त्यांच्या पत्नी सध्या वयस्क असल्याने त्यांना औषधोपचारासाठी पैशांची गरज असते. परंतु मागील वर्षभरापासून पेन्शन जमाच होत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.
वृद्धापकाळात आवश्यकता असतानाच पेन्शन बंद
1956 मध्ये हुतात्मा झालेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नीच्या नावे पेन्शन दिली जाते. सध्या त्या नव्वदीमध्ये असून त्यांना पेन्शनची आवश्यकता असतानाच मागील वर्षभरापासून पेन्शन बंद आहे. याबद्दल मुंबईचे जिल्हाधिकारी, मंत्रालयातील सामान्य प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु पेन्शन नेमकी बंद का आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नसल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
– वृषाली मेणसे (हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांची कन्या)
मंत्रालयात पाठपुरावा करूनही अद्याप ठोस माहिती नाही
सीमाप्रश्नासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सीमासत्याग्रहींच्या वारसांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा पेन्शन देण्यात येते. परंतु हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मी बेन्नाळकर यांची एक वर्षापासून पेन्शन बंद आहे. याबाबत मुंबई येथील मंत्रालयात पाठपुरावा करूनही अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. यासंदर्भात समन्वयक दीपक पवार यांच्याशीही संपर्क करत असल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
– मालोजी अष्टेकर (सरचिटणीस-मध्यवर्ती म. ए. समिती)