प्रतिनिधी/ बेळगाव
भाषावार प्रांतरचनेनंतर सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी झालेल्या आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी रविवार दि. 17 रोजी संपूर्ण सीमाभागात हुतात्मा दिनाचे आचरण करण्यात येते. सीमाप्रश्नासाठी प्राणाची आहुती दिलेल्यांना आदरांजली वाहून मूकफेरी काढण्यात येते. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सीमावासियांना सकाळी 9 वा. हुतात्मा चौकात उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
भाषावार प्रांतरचनेनंतर मराठी बहुल असलेला सीमाभाग अन्यायाने म्हैसूर प्रांतात डांबण्यात आला. 16 जानेवारी 1956 रोजी तत्कालिन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी नभोवाणीवरून राज्य पुनर्रचना मंडळाचा अहवाल स्वीकारण्यात येणार असल्याचे जाहीर करताच सीमाभागात गोंधळ उडाला. दि. 17 जानेवारी रोजी सकाळपासून प्रक्षुब्ध जमाव रस्त्यावर उतरला. सर्व व्यवहार, बाजारपेठ ठप्प झाली. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दणाणून जात होता. सरकारच्या कृतीविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
जमावाला शांत करण्यासाठी बाबुराव ठाकुर, बा. र. सुंठणकर, राम आपटे, कृष्णा मेणसे, डॉ. कोवाडकर, बळवंतराव सायनाक यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु संतापलेले सीमावासीय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे जोरदार घोषणबाजी व निदर्शने करण्यात येत होती. रस्त्यावर उतरलेला जनसमुदाय उग्र बनू लागला होता. हा मोर्चा पाहून पायाखालची वाळू सरकलेल्या म्हैसूर राज्यातील पोलिसांनी निदर्शकांना पांगविण्यासाठी केलेल्या बेछूट गोळीबारात मारूती बेन्नाळकर, मधु बांदेकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे व निपाणी येथील कमळाबाई मोहिते हुतात्मा झाल्या. तर सत्याग्रहातील सहभागी नागाप्पा होसूरकर, बाळू निलजकर, गोपाळ चौगुले यांचाही नंतर कारागृहात मृत्यू झाला.
तेव्हापासून आजतागायत बेळगावसह सीमाभागात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते. सीमाप्रश्न मागील 65 वर्षांपासून तेवत ठेवण्यामध्ये या हुतात्म्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. सर्व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आजी, माजी लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहर म. ए. समितीचे आवाहन
सीमालढय़ातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी म. ए. समिती कार्यकर्त्यांनी सकाळी 9 वा. हुतात्मा चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन सरचिटणीस किरण गावडे, माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव, पंढरी परब, बाळासाहेब काकतकर आदिंनी केले आहे. तर महिला आघाडीच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी केले आहे.
मध्यवर्ती म. ए. समिती
सकाळी 9 वा. हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. बहुसंख्य सीमावासियांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.