सांगली / प्रतिनिधी
मध्य रेल्वेने हुबळी – मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) या गाडीत सांगलीचा स्लीपर कोच कोटा १७६ वरून २५८ तर सिटींग सीट चा कोटा ५६५ केला आहे. त्यामुळे बेळगाव ते मुंबई असा महाग प्रवास बंद होऊन १६५ रुपयात मुंबई गाठणे सांगलीकर प्रवाशांना शक्य होणार आहे.सांगली रेल्वे ग्रुपने रेल बोर्ड आणि मध्य रेल्वेकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सांगलीत जास्त तिकीट उपलब्ध झाल्यामुळे जयसिंगपूर, इचलकरंजी आणि कोल्हापुरातील प्रवाशांची ही सोय झाली आहे.
महालक्ष्मी एक्सप्रेस बरोबरच हुबळी मुंबई गाडी क्र. ०७३१७ या गाडीने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. मात्र त्यात सांगलीला पुरेसा कोटा नव्हता. त्यामुळे बेळगाव ते मुंबई असे आरक्षणाचे जादा पैसे मोजून तिकीट घ्यावे लागत होते. सांगलीतून प्रवासी वाढले तरीही त्याची नोंद रेल्वे कडे होत नव्हती. परिणामी व्यवसाय दिसत नसल्याने स्टेशन विकासाची गतीही मंदावली होती. गेली चार वर्षे कोटा वाढावा म्हणून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. त्यामुळे सांगली नवी मुंबई (पनवेल) आणि सांगली मुबई आरक्षणाला प्रवाशांनी प्राधान्य द्यावे असे आवाहनही सांगली रेल्वे ग्रुपने केले आहे.