2011 साली हुसेन झैदी लिखित ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ नावाचे पुस्तक प्रकाशित झाले. त्या पुस्तकात मुंबई माफियामध्ये काम करत असलेल्या महिलांचा उल्लेख आहे. या पुस्तकाने समाजमान्य स्त्री व पुरुष यांची व्याख्या पुसून आपल्या समोर मानवी मनाबद्दल एक नवीन दृष्टिकोन मांडला आहे. जेनाबाई, सपनादीदी इत्यादींसारख्या स्त्रियांबद्दल वाचले की अंगावर काटा येतो. माणसाची शारीरिक ठेवण त्याची वृत्ती ठरवत नाही. स्त्रियादेखील हिंसा करण्यास सक्षम आहेत हे या पुस्तकातील कथांमधून सिद्ध होते.
या पुस्तकात अनेक स्त्रियांचा उल्लेख आहे ज्यांनी त्यांच्या कृत्याने लोकांना हादरवून टाकले आहे. त्यातले एक नाव नाव म्हणजे गंगुबाई काठियावाडी. आपणापैकी अनेकांनी गंगुबाई काठियावाडी हे नाव ऐकले असेल. हुसेन झैदीच्या या पुस्तकातील गंगुबाईच्या व्यक्तिचित्रावर आधारित अलीकडेच एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची पहिली झलक जेव्हा प्रेक्षकांसमोर आली तेव्हा त्याला खूप संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काही लोक प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टला या भूमिकेत पहायला आतुर होते तर काही लोकांनी या चित्रपटाच्या विषयावरच निषेध व्यक्त केला होता.
पुस्तकातील गंगुबाई, चित्रपटातील गंगुबाई आणि वास्तवातील गंगुबाईची जर तुम्ही तुलना केली, तर एकही वर्णन अजिबात जुळत नाही. पुस्तकामध्ये गंगुबाईबद्दल फक्त माहिती दिली आहे तर चित्रपटात आपल्याला ती मुख्य पात्र म्हणून दिसते. मुळात गंगुबाई काठियावाडी कोण होती? वयाच्या सोळाव्या वषी घरातून आपल्या प्रियकराबरोबर पळून मुंबईत आलेली एक अल्लड मुलगी. पडद्यावरील आभासी जगाच्या प्रेमात असलेली पण खऱया जगाची माहिती नसलेली एक सामान्य मुलगी! तिच्या अभिनेत्री होण्याच्या स्वप्नाने तिच्या मनाला इतके घेरले होते की वास्तव काय आहे याची तिला काहीच कल्पना नव्हती. प्रेमावर आंधळा विश्वास ठेवून अनोळखी शहरात आली आणि त्याच प्रेमाच्या व्यक्तीने तिला एखाद्या वस्तूसारखे 500 रुपयांसाठी विकले. एका दिवसात एका अल्लड मुलीची ती एक शरीरविक्रय करणारी महिला झाली होती.
आलिया भट्टने गंगुबाईचे जे पात्र उभे केले आहे ते काल्पनिक कथेच्या दृष्टिकोनाने उत्तम आहे. एक अभिनेत्री म्हणून त्या भूमिकेला न्याय द्यायचा तिने पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण कल्पनेपेक्षा वास्तव नेहमी वेगळे असते. शरीरविक्रय व्यवसाय हा एक अतिशय वादग्रस्त विषय आहे. काही लोक या स्त्रियांच्या विरोधात उभे आहेत तर काही त्यांच्या बरोबर. या सगळय़ात माणूस हे विसरतो की यातील बऱयाच स्त्रियांना कोणीतरी फसवून या व्यवसायात आणले आहे. अगदी गंगुबाईसारखेच. आणि या निर्दोष मुलींना बाजारात उभे करणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर त्यांच्याच विश्वासातले पुरुष होते. आजही गंगुबाईसारख्या अनेक स्त्रिया आहेत ज्यांची फसवणूक करून त्यांच्या आयुष्याचा लिलाव मांडला जातो आणि खऱया समस्येकडे लक्ष देण्याऐवजी आपण अशी दुःखद परिस्थिती साजरी करत आहोत.
अजूनही समाज स्त्रियांकडे एक व्यक्ती, एक माणूस म्हणून बघत नाही. त्यांच्यावर काही ना काही शिक्का लावला जातोच. त्यांच्या दिसण्यावरून, कपडय़ांवरून, नको नको त्या गोष्टींवरून त्यांना पारखले जाते. एखाद्या बाहुलीसारखे खेळवले जाते. आणि जेव्हा पोटा-पाण्यासाठी त्या बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्या चारित्र्याकडे बोट दाखवले जाते. रस्त्याच्या कोपऱयावर स्वतःला विकणाऱया मुलींना सगळेच नावं ठेवतात, पण त्यांना विकायला भाग पडणाऱया, त्यांच्याकडे वाईट नजरेने बघणाऱया आणि त्यांच्यावर बोली लावणाऱया माणसांना मात्र कोणीच दोषी ठरवत नाही. असे का?
गंगुबाईच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटामुळे गंगुबाईसारखी एक व्यक्ती होती हे तर समजले. पण तिच्या आयुष्याचा प्रचार कोणत्या पद्धतीने झाला आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. शरीरविक्रय व्यवसायात असलेल्या व्यक्तीवर चित्रपट काढू नये का? तर नक्कीच काढावा. पण सध्याच्या काळात गंगुबाईसारख्या बायकांना नायिका म्हणून दाखवले जाते. खरंतर गंगुबाईसारख्या अनेक या नायिका नसून लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या निर्दोष स्त्रिया आहेत, ज्यांना समाजाने निरंकुश केले आहे.
सोशल मीडियावर सध्या या चित्रपटातील गाणी खूप प्रसिद्ध होत आहेत. अनेक जण यातील गाण्यांवर नाचत आहेत. पण ज्या प्रकारचे आयुष्य गंगुबाईने सोसले, ते खरंच आनंद साजरा करण्यासारखे आहे का?
तिच्याबद्दल आणि तिच्यासारख्या अनेक स्त्रियांबद्दल सहानुभूती वाटण्यापेक्षा आपल्याला तिचे कौतुक का वाटत आहे? पडद्यावर दिसणारे भव्य सेट, सुंदर अभिनेत्री आणि त्यामुळे मिळणाऱया प्रसिद्धीमुळे आपण इतके आंधळे झालो आहोत की त्यांच्या वेदनेचा आपण व्यापार करत आहोत. त्यांची अस्पष्ट भाषा, कपडे आणि व्यसने आपल्याला छान वाटू लागली आहेत.
प्रेक्षक म्हणून आपल्याला हे लक्षात येत नाही की या चित्रपटाने जागतिक प्रसिद्धी तर मिळवली, पण याचा फायदा कोणाला होत आहे? त्या स्त्रियांना ज्या या वेदनेतून रोज जात आहेत? अजिबात नाही. याचा भरपूर नफा चित्रपट निर्मात्यांना, दिग्दर्शकाला आणि आलिया भट्टलादेखील नक्कीच मिळाला असेल. पण त्या मुलींचे काय ज्या आजही कामाठीपुराच्या रस्त्यावर उभ्या राहून स्वतःला विकतात? आणि त्यासोबतच त्या मुलांचे काय ज्यांचा जन्म अशा रस्त्यांवर झाला आहे? त्यांची काय चूक? केवळ त्यांच्या आईच्या व्यवसायामुळे त्यांनादेखील समाजामध्ये मान्यता मिळत नाही. योग्य शिक्षण मिळत नाही. मग त्या निर्दोष मुला मुलींनी काय करायचे? बऱयाचदा तेथील मुलींना नाईलाजाने शरीरविक्रय व्यवसायच निवडावा लागतो. आणि मग पुन्हा तेच चक्र चालू होते.
आता प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी काय? या व्यवसायावर या आधीसुद्धा चित्रपट बनवले गेले आहेत. ‘सलाम बॉम्बे’ किंवा ‘मंडी’ सारख्या चित्रपटांचा एवढा बोलबाला, चर्चा का होत नाही? कारण त्यात कठोर सत्य दाखवले आहे. एका स्त्रीची वेदना दाखवली आहे. तिला नायिकेचा दर्जा न देऊन सामान्य स्त्री दाखवली आहे. प्रेक्षकांनी म्हणून पडद्यावर जे दिसेल त्याला मान्य न करता त्या गोष्टींचा खोलवर जाऊन विचार केला पाहिजे. वस्तुस्थितीची जाण ठेवून वागले पाहिजे. कारण जर समाज म्हणून आपण आवाज उठवला तरच क्रांती घडू शकेल. नाहीतर गंगूसारख्या अनेक बायका यापुढेही बळी पडत राहतील!
-श्राव्या माधव कुलकर्णी