‘तुम्ही आमच्या मुलीला काही अभ्यासच देत नाही, तिला लिहायला कधी देणार? त्या शाळेत बघा, ज्युनिअर के.जी.च्या मुलांना रोज एक तास पुरेल एवढे लिहायला सांगतात.’ बालवाडीत आपल्या मुला/मुलीचे नाव घातल्यानंतर काही पालक शिक्षकांकडे अशी तक्रार करतात. त्यांना हे माहित नसते की आठ वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता तिसरीपर्यंतच्या मुला/मुलींच्या हाताची बोटे नाजूक असतात आणि त्यांना लिहिण्याचा अभ्यास देण्याची गरज नसते. ऐकणे, निरीक्षण करणे, बोलणे, वाचणे यानंतर लिहिणे असा शिक्षणाचा क्रम आहे. परंतु लिहिण्याकडे अभ्यासाचा पुरावा या स्वरूपात बघितले जाते. मुळात बरेच काही ऐकल्याशिवाय, वाचल्याशिवाय लिहिता येणार नाही. ‘आडात नाही तर पोहऱयात कुठून येणार?’ ही म्हण माहीत असूनही त्याला अनुसरून वागणूक करण्यास मोठे लोकच विसरतात. शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये लेखी परीक्षेच्या एकाच मापदंडाने सर्व विद्यार्थ्यांना जोखले जाते. त्यामुळे प्रश्न विचारणारा विद्यार्थी हुशार ठरत नाही पण साचेबद्ध उत्तरे देणारा विद्यार्थी हुशार ठरतो. यामध्ये जसा दोष शिक्षण व्यवस्थेचा आहे, तसाच पालकांचाही आहे.
तर मुद्दा असा की, हुशार मुलगा/मुलगी म्हणजे काय? घोकंपट्टी करणे? उत्तम अभिनय करणे? पोपटपंची करणे? सर्वात मिळून-मिसळून वागणे? संगीताचा उत्तम कान असणे? शालेय शिक्षणाच्या ठराविक विषयाच्या लेखी परीक्षेत उत्तम मार्क मिळवणे? एकलकोंडे असणे की मोठा मित्रपरिवार असणे? आपला पाल्य सर्व मित्र-मैत्रिणींच्या कळपामध्ये रमतो, सर्वांबरोबर मिळून मिसळून वागताना त्यांच्यांतली आपापसातली भांडणे सोडवतो/सोडवते, प्राण्यांची इतकी आवड आहे की तो/ती खेळायला गेल्यानंतर सोसायटीमधील/गल्लीमधील कुत्रे घोळक्याने अक्षरशः शेपूट हलवत तिच्या/त्याच्या मागे-मागे असतात, तेसुद्धा बिस्किटाचे आमिष न दाखवता. कोणा मित्र-मैत्रिणीचा आज मूड गेला आहे, हे त्यांना माहित असते आणि ते जाणून सर्वांनी मिळून काय करायचे याचे नियोजन करतात. अशी मुले कदाचित घरी आल्यानंतर गप्प राहतात, मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात काय झाले याची माहिती घरी सांगणे त्याना इष्ट वाटत नाही किंवा घरी त्याची किंमत नाही अशी त्यांची धारणा असते. त्यांना कदाचित एकटय़ाने अभ्यास करण्यात स्वारस्य नसते. अशा मुला-मुलींना पालकांनी ‘आज काय विशेष? ती मैत्रीण काय म्हणते? बरेच दिवसात दिसली नाही?’ असे विचारल्यास मुले घडाघडा बोलू शकतात. पण ‘झाले का गावभर उंडारून?’ अशा शेलकी टोमण्याव्यतिरिक्त फक्त ‘अभ्यास किती केला एवढेच विचारण्यात पालकांना रस/वेळ असेल आणि तर मुले अजूनच एकलकोंडी होतात. पण असा Interpersonal Intelligence असलेल्या मुले/मुलींना योग्य दिशा वेळीच मिळाल्यास ती मुले पुढे उत्तम व्यवस्थापक होऊ शकतात, त्याना मार्केटिंग उत्तम जमते, मानसशास्त्राचा अभ्यास करून ते कोणाचेही उत्तम कौन्सिलिंग करू शकतात. गरज आहे ती घरामध्ये किंमत मिळण्याची आणि पालकांचा मुला-मुलींशी उत्तम संवाद नियमितपणे घडण्याची.
एखाद्या मुला-मुलीला तालाचे उत्तम ज्ञान असते. कोणत्याही गाण्याचा ताल उत्तम पकडता येतो. घरात असलेला हार्मोनियम/ सिंथेसायझर काही गाणी कोणीही न शिकवता उत्तम वाजवतात. काही मुला-मुलांना कविता उत्तमरीत्या समजते. आवडलेल्या गाण्याचे शब्द त्यांच्या चांगले लक्षात राहतात. मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यामधून काहीतरी वेगळीच गाणी ऐकून येतात आणि ती गाणी वाजवण्याचा प्रयत्न करतात किंवा गातात. अशी मुले पुढे कधीतरी कलाकार बनली नाही तरीही किमान उत्तम साउंड इंजिनिअर होऊ शकतात.
काही मुले/मुली उत्तमरीत्या कथा लिहितात किंवा रंगवून सांगतात, काहीजण कविता करतात. काहींच्या कविता मीटरमध्ये असतात तर काहींच्या कविता छंद/वृत्त अशी बंधने पाळत नाहीत. काहीजण वेगवेगळी पुस्तके वाचतात, आपल्याच भाषेत कधी कथा लिहितात / डायरी लिहितात (कधी पालकांना दाखवतात तर कधी घरामध्ये कोणालाही दाखवत नाहीत). त्यांच्यासाठी content writer होण्यापासून पटकथा लिहिणे, उत्तम वक्ता होणे, शब्दांकन करणे असे अनेक पर्याय उपलब्ध असतात.
काही मुलींचे गणित उत्तम असते, त्यांना तर्काने काही प्रश्न सोडवायला आवडते (पण शाळेच्या परीक्षेतील ठराविक उत्तरे द्यायचा कंटाळा असतो), मित्र-मैत्रिणींमध्ये मुद्देसूद वाद घालण्यात असे विद्यार्थी आघाडीवर असतात, काही मुलांना ‘कार’ आणि वेगवेगळ्या वाहनांचे भयंकर वेड असते. कोणत्याही वाहनाचे मॉडेल कोणते आहे, त्यामध्ये नवीन काय आहे याची इत्थंभूत माहिती त्यांना तत्परतेने सांगता येते. अशी मुले अनेक गणिते तोंडी सोडवू शकतात परंतु इतिहासामधील प्रश्नांची साचेबद्ध उत्तरे द्यायला त्याना आवडत नाही.
शरीर सौष्ठव, फिटनेस, डाएट, पोहणे याचाच ध्यास घेतलेली काही मुले/मुली असतात. झुम्बा वगैरेच्या क्लासला जायचा हट्ट धरतात (परंतु पालकांनी सांगितल्याप्रमाणे योगासने करायला त्यांना आवडत नाही), कोणाला नृत्याची आवड असते. परंतु मुलाने तबला शिकावा आणि मुलीने नृत्य करावे असे पालकांचे म्हणणे त्यांनी ऐकलेले असते त्यामुळे वेगळा विचार करण्याचे किंवा तसे काही करण्याचे ‘धाडस’ काही मुले/मुली करू शकत नाहीत.
काही मुले झाडांची, पक्ष्यांची, प्राण्यांची नावे पटकन ओळखतात. त्यांची नजर तीक्ष्ण असते, निरीक्षण कमालीचे असते. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे पालक असतील तर प्राणी-पक्ष्यांमधील बारकावे, त्यांच्यातील फरक मुले लहान वयात उत्तमरीत्या ओळखतात, त्यांची निसर्गाची आवड जपण्यासाठी त्यांना पालकांनी नियमितपणे वेगवेगळ्या जंगलात माहितगार मार्गदर्शकासह पर्यटन घडवले तर अशी मुले चार पावले पुढे जाऊन त्याबद्दल माहिती जमवतात. पुढे कधीतरी यांच्यासाठी पर्यटन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असतात. शालेय शिक्षणव्यवस्थेमध्ये अशा भिन्न स्वभावाची मुले एकत्र येतात आणि त्यांची एकत्र परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेमधील एखाद्याच विषयाची फारच आवड असते पण काही विषयात त्यांना स्वारस्य नसते. अशा मूल्यमापन व्यवस्थेमध्ये कासवाचीसुद्धा पळण्याची परीक्षा घेतली जाते, हत्तीला स्लिम होण्यास सांगितले जाते, चित्ता शंभर मीटरमध्ये पहिला आला तरीही त्याला हरणासारखे 10 कि.मी. च्या मॅरेथॉनमध्ये पळण्याचा सल्ला दिला जातो, चिमणीला गरुडाप्रमाणे सर्वात उंच उडण्याचे आदर्श ठेवण्यास सांगितले जाते. सर्वच विषयात हुशार होण्याच्या नादात मुलांची विशेष गुणवत्ता मागे पडते.
स्वतःच्या शब्दात उत्स्फूर्तपणे निबंध लिहिणारी विद्यार्थिनी मागे पडते आणि साचेबद्ध पद्धतीने निबंध/पत्रे लिहणारा विद्यार्थी सर्वांच्या कौतुकास पात्र ठरतो. उत्स्फूर्तपणे लिहिणाऱया विद्यार्थ्यांचे कौतुक न होता वर्गात जाहीर अवहेलना झाल्यामुळे त्याच्यातला लेखक संपतो आणि सर्वांच्या टाळ्या मिळवण्यासाठी तो/ती साचेबद्धपणे वयाला साजेसा नसणारा पोक्त निबंध लिहितो/लिहिते आणि त्याला हुशार गणले जाते. हे थांबवण्यासाठी पालकांनी त्यांच्या मुलांसाठी अधिकाधिक पैसे नव्हे तर वेळ खर्च करणे गरजेचे आहे.
– सुहास किर्लोस्कर