आमदार महेश शिंदे यांनी सपत्नीक केले पाण्याचे पूजन
वार्ताहर/ पुसेगाव
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात 1997 साली कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या आराखडय़ात ऐनवेळेस समावेश केलेल्या जिहे – कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी तब्बल 26 वर्षांनी नेर तलावात एकदाचे आले.यामुळे कायम दुष्काळी टिळा माथी असलेल्या खटाव तालुक्यातील शेतकरी वर्गाची छाती “56 इंचाने “फुगली असून सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी महत्वपूर्ण असणाया जिहे-कटापुर योजनेचे पाणी सोमवारी सायंकाळी नेर तलावात पोहचले. या पाण्याचे पूजन आमदार महेश शिंदे, सपत्नीक सौ प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी सात वाजता पार पडले. त्यावेळी खटाव ,कोरेगाव तालुक्यातील विविध गावांतील पदाधिकारी ,शेतकरी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
1995 साली मंजूर झालेल्या या योजनेचा फायदा खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला मोठया प्रमाणात होणार असल्याने या भागातील शेतकरी या योजनेकडे डोळे लावून बसले होते. नेर तलाव भरल्यानंतर येरळा नदी बारमाही वाहणार असल्याने अगोदरच शासनाने या नदीवर सुमारे 16 बंधारे बांधले आहेत.अखेर 26 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नेर तलावात पाणी आल्याने शेतकरी वर्गात प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.जिहे कटापूर ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू ” स्व लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना ” असे या योजनेचे नामकरण काही महिन्यांपूर्वी झालेले आहे.
दरम्यान पुसेगाव येथे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस रणजितसिंह देशमुख, पंचायत समिती सदस्या निलादेवी जाधव, माजी बाल कल्याण सभापती वैशालीताई फडतरे,युवानेते सरपंच अभयराजे घाटगे यांच्या हस्ते श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीस जलाभिषेक करण्यात आला. तसेच या पाण्याचे कलश भागातील प्रत्येक गावात दिले असून त्याचा ग्रामदैवतास अभिषेक करण्यात येणार आहे.
गेल्या 26 वर्षांपासून खटाव तालुक्यातील जनता जिहे कटापूर योजनेच्या पूर्णत्वाकडे डोळे लावून बसली होती.ही योजना कार्यान्वित व्हावी म्हणून विविध पक्षाचे तत्कालीन आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदयात्रा,रास्ता रोको,आंदोलने ही केली आहेत.आज स्वप्नपूर्ती झाली असली तरीही गेल्या 26 वर्षात “या, पाण्यासाठी”घडलेल्या विविध गोष्टी जनतेच्या लक्षात आजही कोरल्या आहेत.त्यामुळे जनतेच्या ,शेतकयांच्या भल्यासाठी ही योजना कार्यान्वित झाली ,कुणामुळे झाली? कशी झाली? यापेक्षा झाली! याला सर्वच राजकारण्यांनी दुजोरा द्यावा.”दिवस उगवण्याला महत्त्व द्या,कोंबडा कुणाचा का ओरडणा! “अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे.