प्रतिनिधी/ गुहागर
हेदवी येथील बामणघळीत पडून शनिवारी दुपारी 12 वाजता ठाणे-घोडबंदर येथील एका तरुण दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बामणघळीजवळ सेल्फी घेत असताना भरतीच्यावेळी आदळणाऱया समुद्रीलाटांच्या तडाख्याने आनंद विलास माणगावकर (39) व सुचेता आनंद माणगावकर यांचा मृत्यू झाला.
याबाबत मृताचा मामेभाऊ प्रशांत तानाजी बाईत यांनी गुहागर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार प्रशांत बाईत हे आनंद व सुचेता, त्यांची आई आणि वाहनचालक असे पाचजण मुंबईहून हेदवी येथे आले. सकाळी गिमवी येथे नाष्टा करून ते हेदवी समुद्रकिनारी बामणघळ येथे दाखल झाले. यावेळी समुद्राला भरती असल्याने बामणघळीमध्ये अजस्त्र लाटांनी पाण्याचे तुषार उडत होते. यावेळी आनंद व सुचेता दोघेही सेल्फी काढण्यात मग्न होते. यावेळी मोठय़ा लाटांच्या तडाख्याने सुचेता घळीत पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी आनंद पुढे गेले असता तेही घळीमध्ये पडले. यावेळी अन्य तिघेजण काही अंतरावर होते.
हा प्रकार घडताना तिथे अन्य कोणीही उपस्थित नव्हते. यामुळे प्रशांत यांनी हेदवी गावात जाऊन ग्रामस्थांना याची माहिती दिली. पोलीस पाटील रवींद्र मोहीत, ग्रामस्थ अमेय हळदणकर, सरपंच गजानन हेदवकर अन्य ग्रामस्थ व तटरक्षक दलातील तरूणांसह घटनास्थळी पोहोचले. भरतीचे पाणी कमी झाल्यावर घळीत ओढले गेलेले दोन्ही मृतदेह पाण्यावर तरंगू लागले. ते पुन्हा समुद्रात जाऊ नयेत यासाठी स्थानिक तरूणांनी घळीच्या जवळ उतरून मृतदेह पाण्याबाहेर काढले. यामध्ये सुहास भाटकर, अंगद भाटकर, दीपक भाटकर, भावेश बसणकर, गजानन पवार, मिलिंद पाटेकर यांनी सहकार्य केले. दुपारी 1.30च्या दरम्यान मृतदेह पाण्याबाहेर काढले.
सुरक्षारक्षकाची गरज
गुहागरच्या पर्यटनात महत्वाचे ठिकाण म्हणून हेदवीच्या बामणघळीचा उल्लेख होतो. ग्रामपंचायतीने तेथे पोचण्यासाठी पायऱयांचा मार्ग बनवला आहे, परंतु हे ठिकाण विकसित व सुरक्षित करण्यासाठी शासनाकडून कोणतीही उपाययोजना नाही. ग्रामपंचायतीने अपघातावेळी आवश्यक साधनसामग्री तेथे ठेवली आहे, परंतु कायमस्वरूपी रक्षकाची नियुक्ती शासनाने केलेली नाही. ग्रामपंचायतीने पर्यटकांसाठी सूचनाफलक लावले आहेत, परंतु त्याकडे अनेक पर्यटक दुर्लक्ष करतात. यापूर्वीच्या घटनेत घळीत पडलेल्या एका व्यक्तीला गुहागरातील बहाद्दूर तरूणांनी सुरक्षितपणे बाहेर काढले होते, परंतु शनिवारी कोणीही स्थानिक तेथे नसल्याने या दांपत्याला वाचवणे शक्य झाले नाही. येथे सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी या घटनेनंतर जोर धरू लागली आहे.