ऑनलाईन टीम / भोपाळ :
भोपाळमधील भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या कायम वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यातच आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
आपल्या शापामुळेचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी करकरे ठार झाले, असे वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना आणि भाजपला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. त्यानंतरही प्रज्ञा सिंह यांच्या भूमिकेत कुठलाही बदल झालेला दिसत नाही आहे. हेमंत करकरेंना आपण देशभक्त मानत नाही, असे प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या आहेत.
प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, ‘हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील. पण खरे देशभक्त हे वेगळा विचार करतात. माझ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी करकरेंनी आचार्य-शिक्षकाची बोटं आणि बरगड्या मोडल्या. मला खोट्या प्रकरणात गोवले’. असा आरोपही त्यांनी केला.
पुढे त्या म्हणाल्या, ‘देशात 1975 मध्ये पहिल्यांदाच आणीबाणी लागू झाली होती. पण 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मला अटक झाली तेव्हाही अशीच स्थिती होती’,असे प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या 2008 साली मालेगावात झालेल्या स्फोटातील एक आरोपी आहेत. त्यावेळचे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करत त्यांची चौकशी केली होती.