विशिष्ट धर्माला सांप्रदायिक ठरविले : मतांची गरज नसल्याचे विधान
वृत्तसंस्था / गुवाहाटी
आसाममध्ये आगामी विधानसभा निवडणुकीवरून वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्षांची सक्रीयता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी आसामच्या खासगी मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण व्यवस्था लागू करणार असल्याचे म्हणणारे मंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी पुन्हा एकदा विशिष्ट समुदायाबद्दल टिप्पणी केली आहे. त्यांच्या या नव्या विधानामुळे राजकीय वर्तुळात वाद होणे निश्चित आहे.
भाजपला राज्यात निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी बंगाली मुस्लीम समुदायाच्या मतांची गरज नाही. हा समुदाय आसामी संस्कृती आणि भाषा तसेच समग्र भारतीय संस्कृतीला आव्हान देत असल्याचे शर्मा म्हणाले.
ते स्वतःला ‘मियां’च्या स्वरुपात ओळखू लागले आहेत. हे तथाकथित मियां लोक अत्यंत सांप्रदायिक असून ते आसामी संस्कृती आणि आसामी भाषेला विकृत करण्यासाठी अनेक कारवायांमध्ये सामील आहेत. याचमुळे त्यांच्या मताद्वारे मला आमदार व्हायचे नाही. त्यांनी माझ्यासाठी मतदान केले तर मी विधानसभेत बसू शकणार नसल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे
भाजपकडून संधी नाही
आसामी संस्कृती आणि भाषेला आव्हान देणाऱयांना आम्ही मते देऊ नयेत. सत्तारुढ भाजप स्वतःला मियां म्हणून ओळख ठेवणाऱयांना उमेदवारी देणार नाही, काँग्रेसनेही हाच कित्ता गिरवावा असे विधान शर्मा यांनी केले आहे. आसाममध्ये मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. काँग्रेस-एआययूडीएफ यांची आघाडी झाली आहे. एआययूडीएफला प्रामुख्याने बंगाली मुस्लीम समुदायाचा पाठिंबा प्राप्त होतो.
समुदायाच्या विकासासाठी केले काम
राज्य सरकारने या समुदायाच्या विकासासाठी काम केले आहे, पण हा समुदाय निवडणुकीत पक्षाला मत देणार नाही. 126 विधानसभा मतदारसंघांपैकी 100 जागांवर विजयी होण्याच्या लक्ष्याला या समुदायाची मते प्रभावित करू शकणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.