4 वर्षांमध्ये 37 हजार टक्के अधिक जप्त झाले ड्रग्स
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतात अमली पदार्थांचा अवैध व्यापर सातत्याने वाढतोय. 2018 मध्ये केवळ 8 किलो हेरॉइन जप्त करण्यात आले होते. तर चालू वर्षात हा आकडा वाढून 3 हजार किलोंवर पोहोचला आहे. हेरॉइन जप्त करण्याचे प्रमाण मागील चार वर्षांमध्ये 37 हजार टक्क्यांनी वाढले आहे. डीआरआय आणि एनसीबीच्या अधिकाऱयांनुसार भारत आता अमली पदार्थांच्या व्यापाराचा ट्रान्झिट पॉइंट ठरला आहे. भारतामधूनच मोठय़ा प्रमाणावर छुप्या पद्धतीने अमली पदार्थांचा व्यापार करण्यात येतोय.
अमली पदार्थ तस्करीविरोधात डीआरआय ही देशातील सर्वोच्च गुप्तचर तसेच अंमलबजावणी यंत्रणा आहे. तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) अमली पदार्थांची तस्करी तसेच त्यांच्या वापराला आळा घालण्याचे काम सोपविण्यात आले आहे. विविध राज्यांच्या यंत्रणा देखील मोठय़ा प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करत असल्याचे या दोन्ही यंत्रणांनी सांगितले आहे.
मागील 4 वर्षांमध्ये हेरॉइनच्या तस्करीत प्रचंड वाढली आहे. भारत आता तस्करांसाठी ट्रान्झि पॉइंट ठरत असल्याची स्थिती आहे. पण यंत्रणांनी सर्व बंदरांवरील तपासणी वाढविली असल्याचे डीआरआयच्या एका अधिकाऱयाने सांगितले. अफगाणिस्तानात अफूच्या अवैध शेतीसाठी वापरल्या जाणाऱया जमीन क्षेत्रात 37 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. याचे नियंत्रण आता तालिबानकडे गेले आहे.
2018-19 मध्ये यंत्रणेने 7.98 किलो हेरॉइन जप्त केले होते. तर 2019-20 मध्ये 9.16 किलो हेरॉइन हस्तगत करण्यात आले. तर 2020-21 मध्ये 202 किलो अमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले. यंदा सप्टेंबर महिन्यात गुजरातच्या मुंद्रा बंदरावर 21 हजार कोटी रुपयांच्या हेरॉइनची 3 हजार किलोग्रॅमची खेप पकडण्यात आली आहे.
भारतातूनच व्यापार का?
पूर्वी इराण आणि इराक हे तस्करांचे पसंतीचे ट्रान्झिट पॉइंट असायचे, पण आता अमली पदार्थ भारतातून जात आहेत. यापूर्वी इराण आणि इराकमार्गे अमली पदार्थांचा व्यापार केला जायचा. काही क्षेत्रांमध्ये अमली पदार्थांची खेप चोरीला जाण्याचे प्रकार घडले, विविध देशांकडून निर्बंधही लादण्यात आले. तसेच पाकिसतन या देशांसोबतचे स्वतःचे संबंध बिघडवू इच्छित नाही, याचमुळे हेरॉइन तस्करीसाठी भारताचा ट्रान्झिट पॉइंट म्हणून वापर केला जात असल्याचे एका अधिकाऱयाने म्हटले आहे.
तपास यंत्रणांसमोरील आव्हान
भारतीय यंत्रणांसाठी सर्वात मोठे आव्हान अमली पदार्थांची खेप रोखणे आहे. एनसीबी आणि डीआरआयनुसार समुद्रमार्गाने पाठविण्यात येणाऱया अमली पदार्थांचा थांगपत्ता लावणे अवघड आहे. तसेच अमली पदार्थ जप्त केल्यावर होणार तपास तसेच न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत मोठे काम असते.