मोडी लिपीतून अनेक पिढ्यांच्या वंशावळीची माहिती, तांब्याची सनद ते चोपडीपर्यंतचा प्रवास
कोल्हापूरात माहिती अपडेट करण्यासाठी कर्नाटकातून हेळवी दाखल
प्रवीण देसाई / कोल्हापूर
हेळवी म्हटलं की आपल्या वंशावळीची इथ भूत माहिती सांगणारी व्यक्ती. त्यांच्याकडून मिळालेली माहिती म्हणजे काळ्या दगडावरील पांढरी रेघच म्हणावी लागेल. कुठेही पुरावा म्हणून ग्राह्य धरावी अशी ही माहिती. काही हेळव्यांच्या चोपडीत अनेक पिढ्यांची म्हणजे सुमारे नऊशे ते एक हजार वर्षांपासूनचा वंशावळीचा इतिहास सामावलेला आहे. हेळव्यांची पोतडी म्हणजे वंशावळीचे ‘डाटा सेंटर’च आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही वंशावळीची माहिती अपडेट करण्यासाठी कर्नाटकातील हेळवे कोल्हापूरात आले आहेत. त्यांच्याकडून नवीन माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
दरवर्षी दिवाळीच्या काळात भाताची सुगी संपल्यानंतर कर्नाटकातून हेळवे कोल्हापूर जिह्यात येत असतात. प्रत्येक हेळव्याकडे काही गावे व त्या गावातील कुटूंबे असतात. या कुटूंबांच्या घरी भेट देऊन त्यांना वंशावळीचा इतिहास सांगणे. त्यानंतर घराण्याचे मूळ गाव कुठले?, नंतर कुठे स्थिरावले ?, घराण्याचे मूळ पुरुष कोण? ते कुठून आले? अशी वंशावळीची माहिती सांगितली जाते. त्यानंतर त्या घरात नव्याने जन्माला आलेल्या मुलाची तसेच घरातील नववधूची नोंद पोतडीत करुन वंशावळ अपडेट केली जाते. त्यानंतर ते कुटूंब जे काही दक्षिणा देतील ती घेऊन हे हेळवे पुढील घराकडे नवीन माहिती घेण्यासाठी निघून जातात.
यातीलच एक बाबूराव लक्ष्मण हेळवी (रा. बेक्केरी, ता. रायबाग, जि. बेळगाव) हे कोल्हापूरात आले आहेत. त्यांच्याकडे कोल्हापूर शहरातील बोंद्रे, पतंगराये या घराण्यांबरोबरच कुडीत्रे येथील शेलार, राशिवडे येथील खाडे व कळे येथील भुयेकर घराण्यांसह जवळपास अडीचशे कुटूंबांच्या वंशावळीचा इतिहास आहे. यामध्ये नवीन माहिती अपडेट करण्यासाठी त्यांची भ्रमंती सुरु आहे.
हेळव्यांची नोंद सरकारी दरबारी ग्राह्य
पूर्वीच्या काळी न्याय निवाडा करण्यासाठी न्यायालये नव्हती. त्या काळात हेळव्यांची वंशावळ ग्राह्य धरली जायची. तसेच अलिकडे जातींच्या दाखल्यांसह विविध दाखल्यांसाठी हेळव्यांच्या नोंदी सरकार दरबारी ग्राह्य धरल्या जातात.
हेळव्यांचे वास्तव्य कर्नाटकात
हेळव्यांचे बहुसंख्य वास्तव्य हे कर्नाटकातील रायबाग तालुक्यातील परमानंदवाडी, अथणी तालुक्यातील मुरगुंडी आदी गावांमध्ये आहे. त्या शिवाय महाराष्ट्रातील खटाव (ता. मिरज, जि.सांगली) येथे ही जवळपास तीस घरे ही हेळव्यांची आहेत.
तांब्याची सनद ते पोतडीचा प्रवास
पूर्वी हेळव्यांकडून वंशावळीच्या माहितीसाठी तांब्याच्या सनदीचा वापर केला जायचा. यावर मोळ्याने माहिती नोंद केली जात होती. नंतर यामध्ये बदल होऊन रठमती कागद व अलिकडच्या शंभर दोनशे वर्षात पांढर्या कागदाच्या चोपडीचा प्रवास राहीला आहे. यातील नोंदी या मोडी लिपीतच केल्या जात असून पुर्वापार ही परंपरा चालत आली आहे. वडिलांकडूनच हेळव्याचे ज्ञान मुलांना दिले जाते.
अनेक पिढ्यांच्या घराण्यांचा इतिहास वंशावळीच्या माध्यमातून आमच्या चोपडीमध्ये नोंद आहे. हा इतिहास सुरक्षित ठेऊन त्यामध्ये नव्याने नोंदी करण्याचे काम केले जात आहे. हेळवी काम करणार्यांना आता सरकारच्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन हेळव्यांना सहकार्य करावे.
-बाबूराव लक्ष्मण हेळवी, बेक्केरी, ता. रायबाग, जि. बेळगाव