कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा अपुरी : डॉक्टर, व्हेन्टिलेटर्स, पी. पी. ई. किटस् आताच उपलब्ध असणे आवश्यक
- खासगी डॉक्टरांकडून मदत घ्या!
- गाव समित्या मजबूत करा!
- काटेकोर नियोजनाने यश निश्चित!
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
प्रशासन कितीही सांगो, परंतु येऊ घातलेल्या कोरोनाच्या संकटावर मात करण्याएवढी जिल्हय़ाची आरोग्य यंत्रणा सक्षम नाही, हे वास्तव आहे. येणाऱया संकटाचा सामना करण्यासाठी आपणास पुरेसे डॉक्टर, व्हेन्टिलेटर्स, पी. पी. ई. किटस्, पुरेशी औषधे लागणार आहेत. यासाठी आतापासूनच तयारी ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोव्हिड रुग्णांना ठेवण्यासाठी सर्व सोयींनी युक्त वॉर्ड, क्वॉरंटाईनचे प्रभावी नियोजन करावे लागणार आहे. युद्धपातळीवर हे सर्व करण्यासाठी तात्काळ व नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आपल्या जिल्हय़ावर संकट हे कोसळलेच आहे. बेभरवशी राजकारण्यांनी मागचा पुढचा विचार न करता रेड झोनमधील रहिवाशांसाठी प्रशासनावर दबाव आणून हा जिल्हा खुला केला आहे. रत्नागिरीला कोरोना फैलावाचा जणू स्फोट झाला आहे. येत्या काही दिवसांत सिंधुदुर्गातही हीच स्थिती दिसणार आहे. चाकरमानी येऊ लागले आहेत. आता या संकटाचा मुकाबला करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. या कोरोनावर अद्याप औषध सापडलेले नाही. मात्र प्रभावी आणि नियोजनबद्ध कामगिरीने आपण हे संकट थोपवू शकतो. आतापर्यंत ते थोपवले आहे. पण या पुढच्या काळात आपल्याला अधिक प्रभावीपणे काम करावे लागणार आहे. आपणास हा जिल्हा वाचवायचा आहे. यासाठी प्रशासन, राजकीय नेतेमंडळी, आरोग्य यंत्रणा, या जिल्हय़ातील प्रत्येक नागरिक आणि आलेल्या चाकरमान्यांचे देखील मनापासून सहकार्य लागणार आहे. माणुसकी म्हणजेच मानवतेचा विचार करून आपणास एकमेकांना आधार द्यायचा आहे.
जिल्हय़ातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव
या जिल्हय़ात 38 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यामध्ये 76 वैद्यकीय अधिकारी हवेत. पण प्रत्यक्षात सोळाच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत. बाकी 48 पैकी तीन डॉक्टर कंत्राटी पद्धतीने भरलेले आहेत. उर्वरित 45 जागा हय़ा बी. ए. एम. एस. डॉक्टर घेऊन भरलेल्या आहेत. जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये देखील हीच परिस्थिती आहे. या ठिकाणी वर्ग-1 च्या 21 तर वर्ग-2 च्या 39 जागा रिक्त आहेत. अशा अवस्थेत या यंत्रणेवर जरा जरी ताण पडला तरी ही यंत्रणा कोलमडू शकते.
कोरोना रुग्णांसाठी 100 कॉटांचा वॉर्ड करायचा झाल्यास आपणास त्याकरीता 20 व्हेन्टिलेटर, 20 एम. बी. बी. एस. डॉक्टर, चार भूलतज्ञ, सहा फिजिशियन आणि आय. सी. यू. सांभाळणारे इंटेन्सिव्हीस्ट आवश्यक आहेत. आपल्याकडे सध्या शासकीय स्तरावर अवघे 11 व्हेन्टिलेटर्स उपलब्ध आहेत. तज्ञ डॉक्टरांची वानवा आहेच. अशा परिस्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा ताण आपण कसा पेलणार? काय होणार आहे पुढच्या काळामध्ये? याला एक पर्याय वाटतो तो म्हणजे शासनाने तयार केलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या 50 पदांसाठी एम. बी. बी. एस. डॉक्टरांच्या मुलाखती यापूर्वीच घेण्यात आल्या आहेत. मात्र पुढची प्रक्रिया थांबली आहे. ही पदे तातडीने भरली, तर तत्काळ 50 डॉक्टर आपणास उपलब्ध होऊ शकतात. तसेच राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम योजनेच्या डॉक्टरच्या पोस्ट भरायच्या आहेत. या ठिकाणी देखील इंटरव्हय़ू घेऊन प्रक्रिया थांबली आहे. या सर्व पोस्ट युद्धपातळीवर भरल्या, तर आरोग्य यंत्रणेवरील बराचसा भार हलका होऊ शकतो. या व्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लोड येत असेल, तर जिल्हय़ातील खासगी डॉक्टरना आवाहन केले, तर हे डॉक्टर या केंद्रावरील नॉन कोव्हिड ओपीडीची जबाबदारी घेऊ शकतात. मात्र त्यांना पी. पी. ई. किटस्सारख्या सर्व सुविधा पुरवल्या पाहिजेत. वेळ पडली तर जिल्हय़ातील वैद्यकीय महाविद्यालयातील सिनियर विद्यार्थ्यांची देखील मदत घेता येईल. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार कमी होऊ शकतो. मात्र यासाठी प्रशासनाने आणि येथील लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्ती दाखवायला हवी.
गाव कमिटय़ा मजबूत करा
या सर्व लढाईत आरोग्य खात्याएवढाच सर्वात महत्वाचा रोल हा गावागावातील सक्षम अशा गाव कमिटय़ांचाच राहणार आहे. गावातील क्वॉरंटाईन सेंटर्सची अगदी कार्यक्षम आणि नियोजनबद्ध पद्धतीने काळजी घेतली, तर अर्धी अधिक लढाई जिंकता येऊ शकते. चाकरमान्यांना हुसकावून लावण्याऐवजी त्यांच्याकडून क्वॉरंटाईन नियमांचे कडकपणे आणि संवेदनशिल वृत्ती ठेवून पालन करून घेतले, तर गावही सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे आजपासून प्रत्येक गाववाल्याने मी माझ्या गावचा राखणदार समजून गावाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारायला हवी. मात्र हे काम अतिशय संवेदनशीलपणे आणि माणुसकीचे भान राखून करायला हवे. तरच आपणास ही लढाई जिंकता येईल.
कोरोनाचे संकट वाढले, तर या जिल्हय़ात रेडझोनमधून येणाऱयांना क्वारंटाईन करण्यासाठी गावागावातील सोई नसलेल्या छोटय़ा-छोटय़ा शाळा क्वारंटाईन सेंटर करण्याऐवजी जिल्हय़ातील सर्व सोयींनी युक्त अशा इंग्रजी माध्यमांच्या मोठय़ा शाळा, इंजिनिअर कॉलेज, मोठी हॉस्टेल्स, मंगल कार्यालये याठिकाणी सर्वसंमतीतून क्वारंटाईन सेंटर्स सुरू केल्यास येणाऱया चाकरमान्यांना योग्य त्या सुविधा या मिळतीलच. त्याचप्रमाणे प्रशासनावरील व गावांवरील भारही कमी होऊ शकतो. तसेच बचतगटांची मदत घेऊन क्वारंटाईन होणाऱया लोकांकडून आर्थिक मदत घेतल्यास त्यांच्या जेवण-नाष्टय़ाची उत्तमप्रकारे सोय होऊ शकते. तसेच क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याच्या प्रकारालाही आळा बसू शकतो. वरील प्रकारच्या मोठय़ा प्रमाणावर सुविधा असलेल्या इमारती, शाळा, महाविद्यालये मिळवायची असतील, तर लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे लागेल.
मार्केटमध्ये फिरणाऱया परजिल्हय़ातील वाहनांवर अंकुश हवा
आणखी एक महत्वाचे म्हणजे बाहेरील जिल्हय़ातून या जिल्हय़ात स्वत:च्या गाडय़ा घेऊन आलेले चाकरमानी क्वारंटाईन होऊनदेखील मार्केट परिसरात किंवा इतरत्र गाडय़ा घेऊन बिनधास्त फिरताना दिसून येतात. क्वारंटाईन नियमाचा भंग करून वाहने घेऊन फिरणाऱयांना आळा घालण्यासाठी जिल्हय़ात प्रवेश करीत असतानाच या वाहनांवर शासनामार्फत हे वाहन कुठल्या झोनमधून आले आणि केव्हापासून क्वारंटाईन झाले आहे, याबाबतचा उल्लेख असलेले स्टिकर्स लावणे आवश्यक आहे. जेणेकरून अशी वाहने गावात फिरताना सर्वसामान्य लोकांच्या ती त्वरित निदर्शनास येतील आणि त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल.