एकनाथ महाराज पुढे म्हणतात-कृष्णाने यथाविधी रुक्मिणीचे पाणिग्रहण केले, हे व्यासांच्या कथेचे मूळ सूत्र आहे. त्यांच्या श्लोकांचा अर्थच मी सांगितला आहे. जो हे खरे मानत नाही त्याने मूळ श्रीमद्भागवत हा ग्रंथ पहावा. त्या ग्रंथातील श्लोकांचा श्लोकार्थ असाच आहे. अनेक राजांचा दारूण पराभव करून कृष्णाने रुक्मिणीचे पाणिग्रहण केले हे मूळ कथाबीज. वटवृक्षाचे बीज मोहरीहूनही लहान असते. पण त्याचा विस्तार गगनावर जातो. तसा हा कथाविस्तार आहे. मूळ कथेला सोडून येथे काहीही वेगळे सांगितले नाही.
ग्रंथारंभी ज्याला वंदन केले त्यानेच कथेचा विस्तार केला. कृष्णनाथाला ही कथा आवडली. तोच वक्ता आणि श्रोताही झाला आणि त्याने हे परमार्थ कथन केले. यातील सार म्हणजे हे जीव शिवाचे लग्न आहे. हा अर्थ सावध श्रोत्याला कळतो व त्याला सात्त्विक समाधान प्राप्त होते. जिथे वक्ता विवेकी असतो आणि श्रोता समाधानी असतो, त्यांच्या संवादातून जी कथा प्रकट होते ती सर्वांना सुख देते. अशी ही कथा मी मराठी ओवी छंदात सांगितली आहे.
हे कृष्णकथा अलोलिक । महादोषांसी दाहक ।
भवरोगासी छेदक । अर्धमात्रा सेविलिया ।
हे मुमुक्षीची कुलदेवता। मुक्तांची करी नित्य मुक्तता। येरां संसारियां सर्वथा । नवरसें निववीत ।
जरी कोणी स्वभावें पुढें । उघडती कानींचीं कवाडें ।
अर्थ ऐकतां निवाडें । पुढें पुढें अतिगोड ।
गोडपणें पडल्या मिठी । सुटती जीवशिवांच्या गांठी ।
कृष्णकथा हे गोमटी । उठाउठी विजलाभू ।
येथें भीमकीचे पुरले आर्त । तो हा आदरें वाचितां ग्रंथ। श्रोतयांचे मनोरथ । कृष्ण समर्थ पुरवील ।
माझे पुरवाया मनोरथ । तों मनचि झाले कृष्णनाथ ।
एका जनार्दनीं नित्य तृप्त । परंगत हरिचरणीं ।
एका जनार्दना शरण । म्हणतां गेलें एकपण ।
सहज खुंटलें निरुपण । महामौन कथेचें ।
मुखीं जनार्दनचि वक्ता । जनार्दनचि झाला श्रोता ।
जनार्दनचि ग्रंथ लिहिता । सत्य सर्वथा हे वाणी ।
एका एकजनार्दनीं। जनार्दनचि एकपणीं ।
निर्मळ जान्हवीचें पाणी। मनकर्णिका अतितीर्थ ।
वाराणसी महापुरिं। मनकर्णिकेच्या तीरिं ।
रामजयंतीमाझारिं । ग्रंथ निर्धारिं संपविला ।
शके चवदाशे त्र्याणव । प्रजापति संवत्सराचे नांव ।
चैत्रमासाचें वैभव । पर्व अभिनव रामनवमी ।
ते दिवशीं सार्थक अर्थी । रुक्मिणीस्वयंवरसमाप्ती ।
एका जनार्दन कृपास्थिती। ग्रंथ वाराणसीप्रति संपविला ।
एकनाथ महाराज या कथेचे महात्म्य स्वमुखातून सांगताना पुढे म्हणतात – ही कृष्णकथा अलौकिक आहे. महादोष जाळून टाकणारी आहे. भवरोगावरचे औषध आहे. या कथेचे थोडेसे श्रवण केले तरी श्रोत्याला हे लाभ होतात. ही मुमुक्षुंची कुळदेवता आहे. मुक्त याच्या श्रवणाने नित्य मुक्त होतात तर इतर सर्व सामान्य सांसारिकांना या कथेतील नवरस तृप्त करतात.
Ad. देवदत्त परुळेकर