सध्या सगळीकडे महिलांचाच बोलबाला आहे. चूल आणि मूल या चौकटीतून बाहेर पडलेल्या महिला आज देशाच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. खरंतर भारतीय महिला पराक्रमी आहेत. रणांगणात पराक्रम गाजवणार्या, मातृभूमीसाठी सर्वस्व त्यागणार्या महिलांची अनेक उदाहरणं आपल्याला पहायला मिळतात. असाच पराक्रम चार रणरागिणींनी करू दाखवला आहे. एअर इंडियाच्या सॅन फ्रान्सिस्को-बंगळूरू विमानाचं सारथ्य चार महिला वैमानिकांनी केलं आणि हे उड्डाण यशस्वी करून दाखवलं.
विमान चालवताना वैमानिकाला सगळं कौशल्य पणाला लावावं लागतं. पृथ्वीपासून काही हजार फूट उंचीवरून उड्डाण होत असताना वैमानिकांना कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असावं लागतं. तसं पहायला गेलं तर विमान चालवण्यासारखा थरार नाही. मात्र वैमानिक होण्यासाठी खडतर प्रशिक्षण घ्यावं लागतं. प्रसंगावधान दाखवावं लागतं. भारताच्या चार महिला वैमानिकांनी हे आव्हान पेललं. अमेरिकेतलं सॅन फ्रान्सिस्को ते भारतातलं बंगळूरू दरम्यानचं 13,993 किलोमीटरचं अंतर त्यांनी लीलला पार केलं. जवळपास 17 तास विमान चालवण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली. या महिला वैमानिकांनी एअर इंडियाच्या ‘एआर 176’ विमानाचं सारथ्य केलं. हे विमान बंगळूरू विमानतळावर उतरताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. हे उड्डाण साधंसुधं नव्हतं. पृथ्वीच्या दोन टोकांना एकत्र आणणारं हे उड्डाण होतं. आजवर एअर इंडिया किंवा कोणत्याही भारतीय विमान वाहतूक़ कंपनीच्या विमानाने 17 तासांचा प्रवास केला नव्हता. इतकंच नव्हे तर हे विमान उत्तर ध्रुवावरून आलं. भारताच्या रणरागिणींनी जगातील सर्वात लांब हवाई मार्गावर विमान चालवून दाखवलं.
कॅप्टन झोया अग्रवाल विमानाच्या मुख्य वैमानिक होत्या. कॅप्टन पापागरी तन्मयी, कॅप्टन आकांक्षा सोनवरे आणि कॅप्टन शिवानी मन्हास यांची समर्थ साथ त्यांना लाभली. महिला वैमानिकांनी सारथ्य केलेलं हे भारताच्या हवाई वाहतूक इतिहासातलं पहिलंच उड्डाण होतं. उत्तर धुवावरून याआधीही विमानांनी उड्डाण केलं असलं तरी संपूर्ण महिला वैमानिकांच्या चमूने पहिल्यांदाच ही कामगिरी करून दाखवली आहे आणि या भारतीय महिला वैमानिक आहेत याचा आपल्याला अधिकच अभिमान वाटायला हवा. पृथ्वीच्या उत्तर टोकावरून उड्डाण करताना आपल्याला जग जिंकल्याचा आनंद होत होता, अशी प्र्रतिक्रिया कॅप्टन झोया अग्रवाल यांनी दिली. पृथ्वीचं उत्तर टोक आणि खाली पसरलेला अथांग आर्क्टिक महासागर हे दृश्य विलोभनीय होतं, असं त्यांनी सांगितलं. या महिलांनी 34 हजार फूट उंचीवरून विमान चालवलं. या क्षणी कोणाच्याही अंगावर काटा आला असता. भारताच्या या महिला वैमानिक ऐतिहासिक कामगिरी करून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरल्या आहेतच शिवाय आपण कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करायला सज्ज असल्याचंही या महिलांनी दाखवून दिलं आहे. भारतात दाखल झालेलं ‘राफेल’ हे लढाऊ विमानही एक महिला चालवणार आहे. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह असं या रणरागिणीचं नाव आहे. ‘17 गोल्डन ऍरो स्क्वॉड्रन’मध्ये तिचा समावेश आहे. ती राफेल विमान चालवणारी पहिली महिला ठरणार आहे. आपण कोणापेक्षाही कमी नसल्याचं भारताच्या महिलांनी सिद्ध केलं आहे.