नगर / प्रतिनिधी :
सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार असून, प्रत्येक निर्णयाला विलंब होत आहे. तब्बल 75 दिवसांनी नगर जिह्यात पालकमंत्री येत आहेत. सत्ता स्थापनेनंतर कुणी बंगल्यावरुन, कुणी खात्यावरुन तर कुणी पालकमंत्री पदावरुन नाराज आहेत.नाराजांचे हे सरकारचा फार काळ टिकेल अशी परिस्थिती नाही अशी टीका माजी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. दरम्यान, सरकार टीकाणार नसल्याने आपल्याला संघटनात्मक पदाच्या माध्यमातून आगामी काळात निश्चित संधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगरमध्ये नूतन जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्यासह तालुकाध्यक्ष व मंडलाध्यक्षांचा प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, सरचिटणीस प्रसादढोकरीकर, उपाध्यक्ष युवराज पोटे, श्याम पिंपळे, सचिन पारखी, तुषार पोटे, रमेशपिंपळे, विवेक नाईक, उमेश साठे आदी उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षात नगर जिह्यात अनेक ठिकाणी भाजपाने वर्चस्व प्रस्तापित केले आहे.नगर पालिका, नगर पंचायत अनेक ग्रामपंचायती, महापालिका व पंचायत समित्यांमध्ये सर्वाधिक सदस्य भाजपाचे आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत पक्षामध्ये संघटनात्मक काम करण्यास मोठी संधी असून नूतन पदाधिकाऱयांनी आपल्या पदाला न्याय मिळेल अशी कारकीर्द घडवावी, असे आवाहन माजी मंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱयांना केले.