भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांनी केली तुफान फटकेबाजी
प्रतिनिधी / सातारा
हे राज्य जे आहे ना ते लोकशाहीचे नाही, तर ठोकशाहीचे राज्य झालेले आहे. मग सचिन तेंडुलकरांवर केस दाखल करणार. लता मंगेशकर यांच्यावर केस करण्याची भिती दाखवतात. अमिताभ बच्चन यांच्यावर कारवाई करणार म्हणतात. तुमच्या घरचं राज्य आहे काय? की कायद्याचं राज्य आहे. लोक बघताहेत, ते मतदानाची वाट बघत आहेत. इंदिरा गांधी यांनी सुद्धा या देशात 19 महिने आणीबाणी लागु केली होती. खूप अन्याय अत्याचार केले होते. सगळे जेलमध्ये आहेत करुन टाका निवडणूक असे म्हणून निवडणूका घेतल्या आणि पानीपत झाले. तसेच तुम्ही भ्रमात राहू नका. मुळात तुम्हाला सत्तेसाठी निवडून दिले नव्हते, असे परखड भाष्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही त्यांनी टोला लगावला.
सातार्यात किल्ले अंजिक्यतार्यावर खासदार उदयनराजे यांच्यासोबत पाहणी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गडावर माजी आमदार कांताताई नलावडे, सुनेशा शहा, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, भाजपाचे सांस्कृतिक सेलचे पंकज चव्हाण, विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, निलेश नलावडे, विक्रम बोराटे, सुनील काळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम भाजपाकडून हजारो गावात आयोजित करण्यात आले आहेत. त्यातला हा खूप महत्वाचा कार्यक्रम आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदूत्वाचा केवढा त्याग केला. त्यांनी अजान स्पर्धा आयोजित केली. टीपू सुलतान जयंती केली म्हणून भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीने सर्व जिह्यात शिवगान स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांवर जेवढी गाणी लिहिली गेली आहेत ती गायची. असे प्रत्येक जिह्यात स्पर्धा घेवून जे पहिले आले, त्यांची आज किल्ले अजिंक्यतारा येथे स्पर्धा होती.
पुढे ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी दर्शनाला राजे असताना आम्हाला कोणी बंदी घालणार नाही. देशामध्ये राजेंच्या वाटेला कोणी जाणार नाही. उदयनराजेंच्यासोबत गडावर आलो आहे.
शिवेंद्रराजे राष्ट्रवादीच्या संपर्कात नाहीत
शिवेंद्रराजेंची राष्ट्रवादीची जवळकी वाढली आहे याबाबत पत्रकारांनी छेडले असता चंद्रकांत दादा म्हणाले, अस काही नाही. जे जे राष्ट्रवादीमध्ये होते वर्षानुवर्षे ते राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांचे संबंध असतात, महाराष्ट्रातली संस्कृती आहे. पार्टीच्या वर येवून आपण ऐकमेकांना भेटले पाहिजे. राज्य त्यांचे आहे. शिवेंद्रराजे हे भाजपामध्ये आहेत. त्यांची राष्ट्रवादीची जवळीक वाढलेली नाही. भेटणे तर चालुच असते, असे त्यांनी स्पष्ट केले.