ऑनलाईन टीम / पुणे :
नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे राष्ट्र निर्माणाचा पाया आहेत असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
संसदेच्या केंद्रीय सभागृहात दिनांक 12 जानेवारी, 2021 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसदेच्या पार्श्वभूमीवर राज्यपातळीवरील स्पर्धा नेहरू युवा केंद्र, पुणे आणि राष्ट्रीय सेवा योजना, क्षेत्रीय कार्यालय पुणेच्या वतीने गोखले इंस्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स, पुणे येथे राज्यस्तरीय युवा संसदेच्या उद्घाटन प्रसंगी उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ते म्हणाले, सामाजिक व राजकीय प्रवासाच्या सुरूवातीला नेहरू युवा केंद्र युवा मंडळाच्या माध्यमातून आम्ही कामे केलेली आहेत. केंद्राच्या अनेक उपक्रमात मी सहभागी होतो. या माध्यमातून केलेल्या कामांच्या आठवणींना आज उजाळा देत असताना मनस्वी आनंद होत आहे. कोरोना काळात नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेतून विजयी झालेले स्पर्धक राष्ट्रीय स्तरावरही राज्याचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास मंत्री यांनी यावेळी सांगितले.
भारत हा तरुणांचा देश आहे. ज्या क्षेत्रात काम करायचं आहे तिथे प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश नक्की मिळत. सकारात्मक राहात सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर सर्वकाही शक्य आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आज झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आयाती पिनाक मिश्रा, प्रतीक रमेशराव ठाकरे आणि सलोनी संजय त्रिवेदी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला आहे. 12 जानेवारी 2021 रोजी संसदेच्या केंद्रीय सभागृहात राष्ट्रीय युवा संसद पार पडणार आहे. या स्पर्धेत राज्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने निवड झालेल्या स्पर्धकांना सहभागाची संधी मिळणार आहे.