कौटुंबिक चरितार्थ चालविणे कठीण : सरकारने लक्ष देण्याची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
राज्यातील हॉटेल व्यवसाय बंद असल्याने या व्यावसायिकांसोबत हॉटेलमध्ये काम करणारे वेटर आणि कुक यांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. मागील दोन महिने हॉटेल व्यवसाय बंद झाल्याने हॉटेल कामगारांचे अतोनात हाल झाले आहेत. हॉटेल क्यवसाय पूर्णपणे बुडाल्याने मालकही अडचणीत आले आहेत. येत्या कालावधीत हॉटेल व्यवसाय सुरू होणार की नाही याची खात्री नसल्याने व्यावसायिक प्रचंड दबावाखाली आले आहेत.
राज्यातील बडय़ा तारांकित हॉटेल्ससह मध्यम आणि छोटा हॉटेल्स व्यवसाय गेले दोन महिने पूर्णपणे बंद झाला आहे. राज्यातील हॉटेलमध्ये वेटर, कुक, डीशवॉशर, व अन्य कामे करणाऱयांची संख्या प्रचंड मोठी आहे. हॉटेल व्यवसायामध्ये गोव्यातील मोठय़ा प्रमाणात तरुण काम करीत आहेत. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर 22 मार्चपासून हॉटेल व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. गोमंतकीय व्यावसायिक, उडपी हॉटेल व अन्य तारांकित हॉटेल्स यांची संख्या खुप मोठी आहे. या हॉटेल्समधून गोव्यातील अनेक तरुण काम करतात. त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालवितात.
हॉटेल व्यवसाय बंद झाल्याने कामगार सध्या उघडय़ावर पडले आहेत. त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. छोटय़ा व मध्यम हॉटेलमधून काम करणारे कामगार हे तुटपुंज्या पगारावर काम करतात. महिन्याचा पगार हा तुटपुंजा व चरितार्थापुरताच असतो. त्यामुळे त्यांच्यापाशी बचत असत नाही. आता गेले दोन महिने हॉटेल बंद असल्याने या कामगारांची प्रचंड मोठी अडचण झाली आहे.
सरकारने लक्ष देण्याची गरज
गोव्यातील ग्रामीण भागातील व विशेष करून सत्तरीतील चोर्ला, सुर्ला या भागातील तरुण बऱयाच हॉटेलमध्ये काम करतात. या व्यतिरिक्त गोव्याच्या अन्य भागातील तरुणही हॉटेलमध्ये काम करतात. सहाय्यक म्हणून किचनमध्ये महिलाही काम करतात. तात्पुर्ती व हंगामी नोकरी असली तरी महिन्याकाठी मिळणाऱया पगारावर त्यांचा घरखर्च चालतो, मात्र आता हा व्यवसायच बंद झाल्याने आर्थिकदृष्टय़ा या कामगारांचे हाल झाले आहे. सरकारने या कामगारांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा व त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
या व्यवसायाचे भवितव्य काय?
गेले दोन महिने बंद असलेल्या राज्यातील हॉटेल व्यवसायाचे भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता हॉटेल व्यवसाय कधी सुरू होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. लॉकडाऊनचा काळ कधी संपेल हेही निश्चित नाही. त्यामुळे पुढील चार महिने हा व्यवसाय सुरू होईल किंवा नाही याचीही खात्री नाही. हॉटेल व्यवसायामध्ये अनेकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. राज्यातील तारांकित हॉटेलची सांखळी मोठी आहे. त्याचबरोबर उडपी व गोमंतकीय व्यावसायिकांनीही या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. त्यासाठी बँकांकडून कर्जे घेतलेली आहेत. त्यामुळे व्यवसायही बरेच अडचणीत आले आहेत.