वृत्तसंस्था /मुंबई :
हॉटेल आणि टुरिझम या क्षेत्रांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले पाच महिने मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला होता. त्यांच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम दिसून आला. पण सरकारने अनलॉक 4 अंतर्गत मार्गसूचीनुसार सवलती दिल्याने आता ही दोन्ही क्षेत्रे पूर्वपदावर येण्यासाठी सज्ज झाली आहेत.
हळुहळू या क्षेत्रातल्या हलचाली वाढत असून पूर्ण क्षमतेने व्यवसाय करण्यासाठी या क्षेत्रांना आणखी दोन ते तीन वर्षे लागतील असे तज्ञांना वाटते आहे. आयटीसीचे माजी सीईओ दीपक हक्सर यांच्यामते, पर्यटक आता पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे या क्षेत्राला आता गती घेण्याची संधी मिळणार आहे. आवश्यक त्या सुधारणा करून हे क्षेत्र पुन्हा गतीमान होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान यासारख्या राज्यांना पर्यटक आता भेट देऊ लागले आहेत. स्थानिक पर्यटकांची संख्या वाढत असून त्यांच्यावरच या व्यवसायाची यापुढे भिस्त असणार आहे. अद्यापही परदेशी पर्यटकांवर बंदी असल्याने त्यांची उणीव या क्षेत्राला निश्चीतच जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने येत्या 21 सप्टेंबरपासून अनलॉक 4 अंतर्गत सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांकरता फक्त 100 जणांच्या उपस्थितीसह परवानगी दिली आहे. याचा परिणाम पुढील काळात दिसून येणार आहे.
हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष के. बी. कचरु यांच्यामते अनलॉक 3 व 4 दरम्यान पर्यटकांची संख्या विविध हॉटेल्समध्ये वाढलेली असून ही एक चांगली बाब ठरली आहे. अनलॉक 1 च्या दरम्यान हॉटेलमधील पर्यटकांची संख्या 8 ते 9 टक्के इतकी होती. आता ती 30 ते 35 टक्क्यांपर्यंत वाढली असून काही हॉटेलांमध्ये हे प्रमाण 60 टक्के इतके झाले आहे. हक्सर यांच्या मते हॉटेल व टुरिझम या क्षेत्राला संपूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी 2022-23 सालाची वाट पाहावी लागणार आहे. चालु अर्थिक वर्षात या क्षेत्राला अंदाजे 10 कोटींचा फटका बसला असल्याचेही त्यांनी नमूद केले.