प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात विविध विकासकामे करण्यात येत आहेत. त्यामुळे अंतर्गत विद्युत वाहिन्या, जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, केएलई हॉस्पिटल ते हॉटेल रामदेवजवळ असलेल्या बसस्टॉपनजीक जलवाहिनीला गळती लागून कारंजाच्या स्वरुपात लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
येथील जलवाहिनी, विद्युत वाहिनी घालण्याचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे. मात्र, काही ठिकाणी हे काम अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे येथील जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे निर्दशनास आले आहे.
स्मार्ट सिटीच्या या भोंगळ कारभारामुळे शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे. एकीकडे पाणी वाचवा हा संदेश दिला जातो. मात्र, ज्या ठिकाणी गळती लागली आहे त्याकडेच पाणीपुरवठा विभाग गळती निवारण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.