वृत्तसंस्था/नवी दिल्ली :
दुबईतील हॉटेल रुमवरुन संघव्यवस्थापनाशी वाद झाल्याने आपण मायदेशी परतलो, तसेच धोनीशी मतभेद झाले, यात तीळमात्रही तथ्य नाही. आपले आणि चेन्नई सुपरकिंग्सचे जे भले इच्छित नाहीत, अशा विघ्नसंतोषींनी ही अफवा पसरवली आहे. यात काहीही तथ्य नाही, असा दावा चेन्नई सुपरकिंग्सचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने गुरुवारी केला. यंदाची आयपीएल स्पर्धा दि. 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणे अपेक्षित असून त्यापूर्वीच रैना वैयक्तिक कारण देत दुबईतून मायदेशी परतला आहे.
चेन्नई सुपरकिंग्सचे मालक एन. श्रीनिवासन यांना मी भारतात परतलो, याचे चुकीचे कारण सांगण्यात आले. पण, या सर्व कल्पोकल्पित बाबी आहेत. हॉटेल रुमवरुन चेन्नई संघव्यवस्थापनाशी वाद झालाच नाही. यावर विश्वास ठेवू नये, असे रैना पुढे म्हणाला.
‘जे काही घडलेच नाही, असे किस्से रंगवून मांडण्यात आले आणि हीच वस्तुस्थिती असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न झाला. पण, चेन्नई सुपरकिंग्स हे माझ्या कुटुंब आहे, याची अशा लोकांनी जाणीव ठेवावी. संघमालक श्रीनिवासन हे मला माझ्या वडिलांसारखे आहेत. त्याप्रमाणे ते मला वागवतात आणि मला मायदेशी का परतावे लागले, याची त्यांना आता कल्पना आहे’, याचा त्याने पुढे उल्लेख केला. कौटुंबिक अडचणीवर मार्ग काढल्यानंतर मी आयपीएल स्पर्धेसाठी रवाना होईन, असेही तो याप्रसंगी म्हणाला.
यापूर्वी, रैनाने वैयक्तिक कारण देत दुबईतून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दीपक चहर व यष्टीरक्षक-फलंदाज ऋतुराज गायकवाड कोरोनाबाधित असल्याने रैनाला धास्ती वाटली, त्यामुळे, तो परतला, असेही काही जणांना त्यावेळी वाटले.
दुबईत जैवसुरक्षिततेच्या कारणामुळे जे निर्बंध लादले गेले, त्यावरही रैना नाराज असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती. पण, त्यात काहीही तथ्य नसल्याचा दावा रैनाने केला. ‘माझ्यामागे छोटय़ा सदस्यांचे माझे कुटुंब आहे आणि त्यांना काही झाले तर, ही भीती असणे साहजिक होते’, असे तो येथे म्हणाला.