खानापूर / वार्ताहर
खानापूर शहरांतर्गत जाणाऱया राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक वाढली आहे. येथील नवीन कोर्ट व जांबोटी क्रॉसपर्यंत वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. सुसाट येणारी वाहने त्यात रस्त्याच्या साईड पट्टय़ांमुळे अपघातात वाढ होत आहे. त्यासाठी हलकर्णी फाटा ते वनमाला हॉटेल दरम्यान गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे. अलीकडे जांबोटी क्रॉस ते नवीन कोर्टापर्यंत शहरांतर्गत महामार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. या भागामध्ये नवीन कोर्ट तसेच केएलई कॉलेज व अनेक हॉटेल व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालत आहेत. यापूर्वी केवळ नवीन कोर्टजवळ गतिरोधक बसविण्यात आला आहे. पण त्यापुढील हलकर्णी फाटय़ापर्यंत एकही गतिरोधक नाही, त्यामुळे सुसाट वाहने बेफाम होत आहेत. या मार्गावर गांधीनगर-हलकर्णी तसेच समर्थनगर हिंदूनगर तसेच उपनगरातील पादचाऱयांची व दुचाकीस्वारांची संख्याही मोठी आहे. त्यातच हलकर्णी फाटा ते हॉटेल वनमाला तसेच ओंमकार हॉटेलच्या दरम्यान गतिरोधक नसल्याने सुसाट वाहनामुळे अपघातात वाढ होत आहे. यासाठी या दरम्यान गतिरोधक बसविण्यात यावा व संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.