मंदिर, मशिद, चर्च मात्र बंदच राहणार
प्रतिनिधी / पणजी
तब्बल अडीच महिने बंद राहिल्यानंतर राज्यात आज सोमवारपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल सुरू करण्यात येत आहेत. त्याचबरोबर मंदिर, चर्च, मशिद खुले करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे. मात्र मान्यता दिली असली तरी चर्च, मज्जीद व मंदिरेही भाविकांसाठी खुली करण्याची व्यवस्थापनाची तयारी नाही.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर 20 मार्चपासून हॉटेल, रेस्टॉरंट तसेच अन्य सारेच बंद झाले होते. हॉटेल व्यवसाय तर बंदच होता, तब्बल अडीच महिने हॉटेल, रेस्टॉरंटचा व्यवसाय बंद राहिला. आता केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे व्यवसाय खुले करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आज 8 जूनपासून हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसाय सुरू होत आहेत. कोरोना काळात हे व्यवसाय बंद राहिल्याने व्यावसायिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. या व्यवसायाशी संबंधित कर्मचारी बेकार बनले. त्याचबरोबर हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला साहित्य पुरवठा करणाऱयांचाही व्यवसाय पूर्णपणे बुडाला.
हॉटेल, रेस्टॉरंटसाठी 144 कलम सरकारने शिथिल केले आहे.
निर्बंध घालूनच व्यवहाय खुले
हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल सुरू करण्यात येणार असले तरी त्यासाठी मात्र अन्न व औषध प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. मास्क घातल्याशिवाय हॉटेल, मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. सामाजिक दूर बाळगावी लागेल. गर्दी होईल असे कार्यक्रम करता येणार नाहीत. त्यामुळे हे सर्व निर्बंध पाळूनच व्यवसाय सुरू करावा लागणार आहे.
धार्मिक स्थळे 30 जूनपर्यंत बंदच
मंदिर, मज्जीद, चर्च ही धार्मिकस्थळे खुली करण्यास नव्या मार्गदर्शक तत्वानुसार मान्यता देण्यात आली असतली तरी धार्मिक स्थळे खुली न करण्याचा निर्णय मंदिरांनी घेतला आहे. फोंडा तालुक्यातील प्रमुख 9 मंदिरांच्या अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱयांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी आज 8 जून रोजी मंदिरे खुली न करण्याच निर्णय घेतला. 30 जूनपर्यंत मंदिरे बंदच राहणार आहेत. राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पणजीचे महालक्ष्मी मंदिर व वास्को आणि अन्य परिसरातील बहूतेक मंदिर समित्यांनी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चर्च आणि मज्जीद समित्यांनीही 30 जूनपर्यंत चर्च व मज्जीद भाविकांसाठी खुली न करण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल गोवा मुस्लिम संघटनेने याबाबतचे निर्णय जाहीर केले आहेत, तर चर्च संघटनेनेही सर्व पाद्रींना 30 जूनपर्यंत चर्च बंद ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे सरकारने मान्यता दिली तरी धार्मिकस्थळे तुर्त तरी बंदच राहणार आहेत.
रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत हालचाली बंद
रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतूक व लोकांना बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व हालचली बंद राहणार आहेत. ज्या व्यवसाय व धार्मिकस्थळांना मान्यता दिली आहे ते वगळता अन्य सर्व व्यवसाय बंद राहणार आहेत. त्याबाबतचे आदेश रविवारी न्यायदंडाधिकाऱयांनी नव्याने जारी केले आहेत. शाळा, कॉलेज व अन्य शैक्षणिक संस्था बंदच राहणार आहेत.