प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे 2020-21 या शैक्षणिक वर्षातील दहावीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर दहावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 19 जुलै आणि 22 जुलै या दोन दिवशी परीक्षा होणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 30 जून रोजी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट वितरण करण्यास प्रारंभ होणार आहे, अशी माहितीही शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा पंचायतींचे सीईओ, जिल्हा पोलीस प्रमुख, ट्रेझरी अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकाऱयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्यानंतर दहावी परीक्षेबाबतचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर शिक्षणमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. दहावी परीक्षेबाबतची मार्गसूची अलिकडेच जारी करण्यात आली आहे. त्यानुसार 19 जुलै रोजी गणित, समाज आणि विज्ञान विषयांचा पेपर होणार आहे. तर 22 जुलै रोजी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा विषयांचा म्हणजेच मराठी, कन्नड आणि इंग्रजी विषयांचा पेपर असेल. इतर माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय भाषा विषयांचा पेपर होईल. सर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरुपात असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ओएमआर शिटवर उत्तरे नमूद करावी लागणार आहेत. सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 पर्यंत पेपर होईल. एका पेपरसाठी तीन तासांचा अवधी निर्धारित करण्यात आला आहे.
प्रत्येक विषयाला 40 गुण असतील. म्हणजेच एक पेपर 120 गुणांचा असणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे आणि पुढील शिक्षणासाठी अनुकूल व्हावे, यासाठी सरकारने परीक्षा पद्धतीत बदल केला आहे. भाषा विषयांचा एक पेपर आणि इतर विषयांचा एक पेपर असे दोन दिवस परीक्षा घेण्याची योजना शिक्षण खात्याने याआधीच जाहीर केली होती.
कोरोनाबाधित विद्यार्थीही देऊ शकणार परीक्षा…!
कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षा देण्यास इच्छुक असेल तर त्याला नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्ये व्यवस्था करण्यात येईल. जर परीक्षा देणे शक्य झाले नाही तर त्यांना पुढील वेळेस प्रेशर्स म्हणून परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. त्याचप्रमाणे परीक्षा कामांसाठी हजर होणाऱया प्रत्येकाने लसीचा किमान एक डोस तरी घेतलेला असावा. जर परीक्षा प्रक्रियेत सहभागी होणारी व्यक्ती कोरोनाबाधित असेल तर त्यांच्याऐवजी पर्यायी व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार आहे. अशी माहितीही शिक्षणमंत्र्यांनी दिली.
परीक्षा देणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याची थर्मल स्क्रिनिंगने तपासणी करण्यात येणार आहे. ताप किंवा कोरोनाची लक्षणे असणाऱया विद्यार्थ्यांना स्वतंत्र आसनव्यवस्था करण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला एन-95 मास्कची आवश्यकता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वच्छ कापडी मास्क किंवा सर्जिकल मास्कचा वापर करावा. जर कोरोनाची लक्षणे असतील तर त्या विद्यार्थ्यांना एन-95 मास्क सक्तीचा असणार आहे.
यंदा 8.76 लाख परीक्षार्थी
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी परीक्षा घेतल्या जात आहेत. मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील यशस्वीपणे परीक्षा पार पडणार आहे. यंदा 8 लाख 76 हजार 581 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यंदा एका वर्गखोलीत 12 विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्था असेल. 73,066 परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेदिवशी परीक्षा केंद्राच्या 200 मिटरपर्यंतच्या परिसरात जमावबंदी जारी असणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.
बारावीचा निकाल जुलैच्या दुसऱया आठवडय़ात
बारावीचा निकाल 30 जुलैपूर्वी जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जुलैच्या दुसऱया आठवडय़ात बारावीच्या निकालाची घोषणा करणार आहे. मूल्यमापन कोणत्या स्वरुपात करावे, यासंबंधी 12 सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या सल्ल्यानुसार मूल्यमापन करण्यात येणार आहे. बारावीच्या रिपीटर्स विद्यार्थ्यांनी देखील परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्याची मागणी करून उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याबाबतही लवकरच ठोस निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री एस. सुरेशकुमार म्हणाले.