प्रकल्प अन्य ठिकाणी हलविण्याची मागणी
वाळपई / प्रतिनिधी
होंडा औद्योगिक वसाहतीत उभारण्यात येणाऱया नवीन पेपरमिल प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या बाबतीत डावलले जात आहे. त्याचप्रमाणे या प्रकल्पामुळे प्रदूषण होत असून अनेक वेळा तक्रारी करून देखील प्रकल्पाचे व्यवस्थापन अजिबात लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे संतप्त बनलेल्या होंडा भागातील नागरिकांनी आज या प्रकल्पावर मोर्चा नेऊन तीव्र निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर स्थानिकांना रोजगारात प्राधान्य न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी प्रकल्पामध्ये घुसलेल्या स्थानिकांनी प्रकल्पातील एका कर्मचाऱयांचा मोबाईल घेऊन तो फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटनाही घडली.
याबाबतची माहिती अशी की, होंडा औद्योगिक वसाहतीमध्ये पेपरमिल प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाचे बांधकाम करण्यापूर्वी स्थानिक पंचायतीचा नाहरकत दाखला घेण्याची गरज होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही राजकारणी लोकांना हाताशी धरून या प्रकल्पाचे अचानकपणे काम सुरू झाल्यानंतर स्थानिकांमध्ये खळबळ निर्माण झाली होती. सध्या हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून प्रायोगिक तत्त्वावर उत्पादनाला सुरुवात झालेली आहे. यामुळेच सभोवतालच्या परिसरात धूळ प्रदूषण होत आहे.
बैठकीत प्रकल्पाला विरोध
दरम्यान पेपरमिल प्रकल्पाच्या विरोधात आज सालेली येथील एका खाजगी फार्मवर महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अनेक मान्यवरांनी प्रकल्पाच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रसंगी उपस्थित असलेले भाजपचे स्थानिक नेते विश्वजित कृष्णराव राणे यांनी या प्रकल्पाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला व स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास ही कंपनी अपयशी ठरत असेल तर ही कंपनी अन्य भागांमध्ये स्थलांतरित करा अशी जोरदार मागणी केली.
प्रकल्पावर मोर्चा
या बैठकीमध्ये उपस्थित नागरिक व तरुणांनी या प्रकल्पावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मोर्चेकरांनी प्रकल्पाच्या प्रमुख गेटवर जाऊन निदर्शने केली. त्यानंतर प्रकल्पाच्या आवारामध्ये जाऊन प्रकल्पाची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. आज रविवार असल्याचे मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित कर्मचाऱयांबरोबर बाचाबाची होऊन संतप्त नागरिकांनी एका कर्मचाऱयाचा मोबाईल हिसकावून घेतला व त्याची मोडतोड केली. आंदोलनाची शूटिंग करीत असल्यामुळे त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती मिळताच वाळपई पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
सुशिक्षितांना डावल्यास गंभीर परिणाम.
या प्रकल्पाचे काम करीत असताना गोमंतकीयांना कॉन्ट्रक्ट देण्यात आलेले नाही. सदर कॉन्ट्रक्ट स्थानिकांना दिले असते तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली असती. त्यामुळे आजच्या या मोर्चाच्यामुळे व्यवस्थापनाने गंभीर होणे गरजेचे आहे अन्यथा येणाऱया काळात महामोर्चाद्वारे या प्रकल्पाचे काम बंद करण्याचा इशारा मोर्चेकऱयांनी दिलेला आहे.