वार्ताहर /काकती
बेळगाव तालुक्यातील अनेक गावात रस्त्याकडेला, नाले, नदी अशा ठिकाणी कचरा-घनकचरा टाकला जात आहे. ही सार्वजनिक ठिकाणे उकिरडय़ाची बनली असल्याने पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे. घरातील कचरा आपल्या जागेत कुजवा आणि विल्हेवाट लावा. शून्य कचरा मोहीम प्रत्येकाने राबविल्यास सार्वजनिक ठिकाणे उकिरडे बनणार नाहीत.
गेल्या 20 वर्षांत प्लास्टिकचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. बाजारातून किराणा मालासह कोणतीही वस्तू प्लास्टिक बॅगमधून घरी आणली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग आदी ठिकाणच्या सर्व्हिस रस्त्यांच्या बाजूला हॉटेल, धाबा, टपरी, खानावळ, मिठाई अशा व्यावसायिक अस्थापनातील ओला कचरा, रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी टाकलेला दिसून येत आहे. टाकाऊ अन्नपदार्थांवर भटकी कुत्री ताव मारत असल्याचे दिसून येते. अशा रस्त्यांतून मार्गक्रमण करणाऱया वाहनांना अडचणीचे झाले आहे. त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
काकती, होनगा, बेन्नाळी, भुतरामहट्टी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रस्त्याकडेने ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे दिसून येतात. शहराच्या चोहोबाजूंनी असलेल्या गावांच्या रस्त्यातून परिसरात सार्वत्रिकपणे कचरा विपुल प्रमाणात पडलेला आहे.
ग्रामीण भागात सर्व खेडेगावांतून सुशिक्षित समाजात स्त्री-पुरुष, युवक-युवती आहेत. प्रत्येकजण आपले घर स्वच्छ ठेवत आहेत. मात्र, आपल्या घरातील प्लास्टिक-घनकचरा रस्त्याच्या कडेला राजरोसपणे टाकून देत आहेत. काही ठिकाणी गटारीत टाकल्याने गटारी बंद होत आहेत. कॅरीबॅगच्या स्वरुपात मोठय़ा प्रमाणात गावामध्ये प्लास्टिकचा शिरकाव झाला आहे. प्लास्टिक उकिरडय़ात गेले आहे. पण ते कुजत नाही. तसेच ते शिवारातही गेले आहे. सुपीक मातीत प्लास्टिकचे मिसळणेदेखील पिकांच्या वाढीसाठी मारकच आहे. 2014 पासून स्वच्छ भारत अभियानाला देशव्यापी चळवळीचे स्वरुप देण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः हाती झाडू घेऊन दिल्लीतील मंदिर, मार्ग, पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ केला होता. त्यानंतर ग्रामीण भागात स्वच्छता अभियान, स्वच्छता पंधरवडा, स्वच्छता राबविणाऱया गावांना निर्मल ग्राम पुरस्कार देण्यात आले आहेत. मात्र, पुरस्कार घेण्यापुरतीच ही गावे राहिली आहेत. याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास तालुक्यातील बेकिनकेरे गावाला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला होता. तेथील ग्रा. पं. ने लोकांच्या सहभागातून गाव स्वच्छ व सुंदर ठेवले होते. मात्र ते निर्मल ग्राम पुरस्कारापुरतेच राहिले.
पूर्वीचा समाज अडाणी असूनही जागरुक होता. आपल्या घरातील काडी-कचरा जाळत होता. ओला घनकचरा शेणखड्डय़ात टाकत होता. मात्र, आजचा शिकलेला समाज स्वतःचे घर सुंदर ठेवतो, पण कचरा रस्ता व सार्वजनिक ठिकाणी टाकतो आहे. आणि प्रत्येक वेळी ग्रा. पं. ला दोष देतो. सर्वांनी कचऱयाची विल्हेवाट घरातच लावल्यास तालुक्यातील सर्व गावे स्वच्छ व सुंदर होतील. रस्त्यावरच्या व्यावसायिक आस्थापनांनी कचरा रस्त्याकडेला न टाकता विल्हेवाट लावल्यास अधिक स्वच्छ, सुंदर दिसतील. ही स्वच्छतेची संवेदना जागृत ठेवणे गरजेचे असून भावी पिढीलाही गाव स्वच्छ ठेवण्याची शिस्त लागेल.