प्रतिनिधी/ सातारा
होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यावरून नागरिक नाराज झाले आहेत. अनेकांनी ’रुग्णाला घरचे जेवण कसे मिळणार?, शासनाकडे पुरेसे बेड, मनुष्यबळ आहे का?’, असे प्रश्न केले आहेत. तर, काहींनी सरकारने याबाबत पुन्हा विचार करावा, अशा सूचना केल्या आहेत. यामुळे होम आयसोलेशन रद्द केले असले तरी त्याबाबत जनतेमध्ये संदिग्धता असल्याचे समोर येत आहे.
होम आयसोलेशन बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर साताऱयात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ’होम आयसोलेशनमध्ये उपचाराबरोबरच मानसिक आधार मिळतो. रुग्णालयाच्या बिलाचे टेन्शन राहत नाही. सोय असलेल्या आणि सौम्य लक्षणांच्या रूग्णांना निवडीचे स्वातंत्र्य मिळावे. सरकारने निर्णयाचा फेरविचार करावा’, अशा अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहेत.
जिल्हा रेड झोनमध्ये गेल्याने जिह्यातील होम आयसोलेशन 100 टक्के बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयावर साताऱयात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. व्यंकटपुरा पेठेतील अजया करंबेळकर म्हणाल्या, आपल्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर उपचाराचा खर्च किती येणार? याचे टेन्शन असते. आजारापेक्षा खर्चाचा मुद्दा रुग्ण व कुटुंबीयांना अधिक सतावतो. शक्य असेल तर कुटुंबात राहून बरं व्हायला नक्कीच मदत होते.
अधिक गरजेच्या रुग्णाला बेड उपलब्ध व्हावा यासाठी सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णाला गरज नसेल तर होम आयसोलेशन हा पर्याय निवडणे अधिक चांगले. नाहीतर बेडसाठी रुग्णालयाच्या दारात रांगा लागतील, असे परखड मत संकेत कुलकर्णी या युवकाने व्यक्त केले आहे.
’शासनाने कोरोनावरील सर्व उपचार मोफत करण्याचा निर्णय घ्यावा. तेव्हा कुठे लोक निःसंकोच रुग्णालयात भरती होतील. तरच होम आयसोलेशन बंद करण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह असेल’, अशी कळकळ समीर थोरात यांनी व्यक्त केली. ’कोविड सेंटरमध्ये गंभीर रुग्णांना होणाऱया त्रासाचा विपरीत परिणाम इतर रुग्णांवर होतो. त्यामुळे घरगुती वातावरणात रुग्णाला जास्त बरे वाटते. म्हणून सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा’, असे मत वैदेही करंबेळकर यांनी मांडले आहे.
दरम्यान, होम आयसोलेशन बंद करताना संभाव्य वाढत्या रुग्ण संख्येला पुरेसे ठरतील इतके बेड, आरोग्य कर्मचारी स्टाफ, डॉक्टर शासनाकडे उपलब्ध आहेत का? याचा विचार करून तारतम्याने निर्णय घ्यावा’, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.