प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात कोरोना बाधितांचा आकडा हा हजारीच्या पुढे जावू लागला आहे. त्याला जबाबदार नागरिकच आहेत. तसेच जे होम आयसोलेशनमध्ये रुग्ण आहेत. ते रुग्ण बाहेर फिरत असल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे काम त्या भागातील अंगणवाडी सेविका, आशा यांचे आहे. असे रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास आता त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तसेच बाधित रुग्णांना रुग्णालयात किंवा संस्थात्मक विलीनीकरण कक्षात ठेवण्यासाठीच नियोजन करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरु आहेत.
कोरोना बाधितांचा दररोजचा वाढत चाललेला आकडा पहाता प्रशासनाकडून उपाययोजना कशा करता येतील आकडा कसा कमी आणता येतील यावर दररोज चर्चा सुरु आहेत. त्याच अनुषंगाने प्रशासनाच्या असे निदर्शनास आले की जिह्यात बाधित आढळून आलेले रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण बाहेर फिरतात. त्यांच्यामुळे संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे आकडा वाढत आहे. त्याच अनुषंगाने उपाययोजना म्हणून जेथे जेथे बाधित रुग्ण आहेत. त्या होम आयसोलेशन रुग्ण घरातच विलिनीकरणात आहे का की बाहेर फिरतो आहे याची माहिती देण्याचे काम व त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे काम त्या परिसरातील अंगणवाडी सेंविका व आशा सेविका यांची आहे. त्यांच्याकडून माहिती प्रशासनाला दिली तर त्या रुग्णांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. असा निर्णय झाला आहे. दरम्यान, होम आयसोलेशनमधील रुग्णांना संस्थात्मक विलीनीकरणात ठेवण्यासाठी तशी तयारीही प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरु आहेत. तसेच लिखीत आदेश निघण्याची शक्यता आहे.
अशा रुग्णांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे
जे बाधित रुग्ण आहेत ते होम आयसोलेशनमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार विलिनीकरणातच राहणे आवश्यक आहे. तसे न राहिल्यास खुले आम फिरल्यास त्याच्याकडून इतरांनाही बाधा होवू शकते. त्यामुळे अशा मोकाट फिरणाऱया रुग्णांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, असे जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी सांगितले.