जिल्हय़ाचे तापमान 40 अंशावर
मनोज पवार/ दापोली
होळीच्या सणानिमित्त होणाऱया बेसुमार वृक्षतोडीमुळे जिह्यातील पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र होळीला धर्माचे व देवाचे अधिष्ठान असल्यामुळे या बाबत प्रखरपणे जनजागृती करण्याचे धाडस सध्यातरी सामाजिक संस्था, वनखाते करताना दिसत नाहीत. मार्च महिन्यात जिल्हय़ाचे तापमान 40 अंशांवर पोहोचल्याने पर्यावरणासाठी ही धोक्याची सूचना असल्याचे मानले जात आहे.
सध्या जिह्यात होळीचा सण जोरात सुरू आहे. जिह्यामध्ये सुमारे 1 हजारपेक्षा अधिक गावे आहेत. होळीनिमित्त या प्रत्येक गावांमध्ये किमान एकतरी होळी पेटवण्यात येते. काही गावांमध्ये तर वाडीवाडीवर होळय़ा पेटवण्यात येतात. यासाठी सर्रास शेवरीच्या झाडांची तोड करण्यात येते. याला शीत म्हणतात. शिवाय याबरोबर 9 दिवसांच्या 9 होळय़ा व मोठा होम असतो. यादिवशी तर सर्व प्रकारची झाडे, झाडांच्या मोठाल्या फांद्या, जनावरांना खाण्यासाठी उपयुक्त असणारा गवताचा चारा जाळून राख करण्यात येते. एकीकडे ‘झाडे जगवा, झाडे वाचवा’चा नारा देणारे वनखाते मात्र या दिवशी होणाऱया बेसुमार वृक्षतोडीकडे कानाडोळा करताना दिसून येते.
होळीला धर्माचे अधिष्ठान असल्यामुळे या वृक्षतोडीच्या चुकीच्या उपक्रमाला नैतिक अधिष्ठान मिळाल्याचा झाडे तोडणाऱयांचा गैरसमज झालेला असतो. ज्या प्रमाणात ही झाडे तोडण्यात येतात. त्या प्रमाणात वृक्षारोपण होताना दिसून येत नाही आणि जर वृक्षारोपण झाले तर ती झाडे पावसाळ्यानंतर जगवताना कोणीही दिसून येत नाही. यामुळे सध्या मार्च महिन्यातच जिह्यातील तापमान 40 अंश झाल्याचे बोलले जात आहे. हे असेच सुरू राहिले तर येत्या काही वर्षांत या तापमानात वाढ होण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करताना दिसत आहेत. शिवाय गावोगावी होळय़ा पेटवल्याने उष्म्यात आणखी वाढ तर होतेच, शिवाय हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणातही वाढ होते. हा काळ भाजावळीचाही असल्याने वातावरण अचानक बदलते. याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.