ऑनलाईन टीम / बारामती :
होळ ग्रामपंचायत व महावितरण सोमेश्वर उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘महा कृषी ऊर्जा अभियानां’तर्गत होळ येथील शेतकऱ्यांनी ५० लाखांचा वीजबिल भरणा केल्याने गाव पातळीवर उपलब्ध झालेल्या कृषी आकस्मिक निधीतून दोन रोहित्रांची तातडीने उभारणी केल्याबद्दल ग्रामपंचायतीने वीज अभियंता व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करत महावितरण चे आभार मानले.ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून राज्यात ‘महा कृषी ऊर्जा अभियाना’अंतर्गत कृषी ऊर्जा पर्व राबविले जात आहे. त्याअंतर्गत थकित कृषी वीजबिलाचा भरणा करून गावची वीज यंत्रणा बळकट करण्यासाठी आता अनेक गावे पुढे येत आहेत.
बारामती परिमंडलात मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या निर्देशानुसार ज्या गावात थकबाकीचा भरणा झालेला आहे. तिथे राखीव आकस्मिक निधीतुन तातडीने ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार गावातील वीज यंत्रणा दुरुस्तीची कामे केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून होळ येथील शेतकऱ्यांनी वीज बिलापोटी भरलेल्या रकमेतून गावाला उपलब्ध झालेल्या कृषी आकस्मिक निधीतून नवीन रोहित्रांची कामे करण्यात आली आहेत. वायाळपट्टा शाळेजवळ १०० केव्हीए क्षमतेचे व होळ गावठाण येथे २५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र उभारण्यात आले. तसेच ‘एक गाव, एक दिवस’ उपक्रम राबवून दिवसभरात ठिकठिकाणी दुरुस्तीचीही अनेक कामे केली.
महावितरणने दाखविलेल्या तत्परबद्दल ग्रामपंचायतीने शुक्रवारी (दि.१२) मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, सोमेश्वरचे उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांच्यासह सर्व वीज कर्मचाऱ्यांचा गौरव केला. शुक्रवारी या कार्यक्रमात २०८ शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आली. पैकी ८७ शेतकऱ्यांना दिवसभरात वीजजोडणी देण्याचे काम सुद्धा महावितरणने केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीकडून व महावितरणकडून थकबाकी भरण्याचे आवाहन केले जात आहे.
ग्रामस्थांनी त्यांच्याकडील थकबाकी भरल्यास करंजी येथे प्रस्तावित केलेले ३३ केव्ही वीज उपकेंद्र सुद्धा कृषी आकस्मिक निधीतून होऊ शकते असा विश्वास होळ वासियांना आला आहे. या कार्यक्रमासाठी बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, होळचे सरपंच संतोष होळकर यांच्यासह परिसरातील नागरिकही उपस्थित होते.