पावसामुळे डोंगरावरील पाणी-माती रस्त्यात : दुचाकीसह अवजड वाहतूक धोकादायक
प्रतिनिधी/कुदनूर
बेळगाव मार्गावरील होसूर घाटातील पावसामुळे तसेच गटारी अभावी डोंगरावरील पाणी आणि माती थेट रस्त्यात येत आहे. त्यामुळे चढ-उतार असलेल्या या घाट मार्गावरील दुचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक धोकादायक बनत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संभाव्य धोका ओळखून रस्त्यात पाणी आणि माती येऊ नये अशाप्रकारे गटारी काढून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे.
चंदगड तालुक्यापासून पूर्वेकडे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील होसूर गावापासून काही अंतरावर कोवाड-बेळगाव मार्गालगत डोंगरावर एका बांधकाम प्रकल्पाचे काम सुरु आहे. दादा डेव्हलपर्स यांच्याकडून सुमारे अकरा एकरच्या या परिसरात सपाटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे येथील रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या गटारी बुझल्या आहेत. या परिसरात मोठा पाऊस होत असल्याने डोंगरावरील पाणी आणि माती गटारी अभावी थेट रस्त्यात येत आहे. या घाट रस्त्याला चढ आणि उतार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहून रस्त्यात आलेल्या माती-पाण्यामुळे दुचाकी वाहने घसरण्यासह लहान-मोठे अपघात घडण्याचे प्रकार होत असतात. याशिवाय अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणात याच मार्गाने होत असल्याने अशा वाहनांनाही एकप्रकारे कसरत करावी लागत आहे.
रात्रीच्यावेळी अपघाताला आमंत्रण…
होसूरसह परिसरातील अनेकजण नोकरीनिमित्त बेळगावला दुचाकीवरून नियमित ये-जा करत असतात. रात्रीच्यावेळी कामावरून घरी येत असताना रस्त्यात वाहून आलेली माती आणि पाणी निदर्शनास येत नसल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचा संभव अधिक आहे. याशिवाय उतारामुळे वाहनांचा वेगही नियंत्रणात नसतो. अशातच अपघाताला आमंत्रण दिले जाते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी गटारीची खुदाई करून अपघात टाळणे गरजेचे आहे.