रत्नागिरी केंद्र समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सांस्कृतिक संचलनालयाने 60 व्या राज्य नाटय़ स्पर्धा आयोजनाची तारीख लांबणीवर टाकण्याच्या निर्णयात बदल करत सांस्कृतिक संचालनालयाने राज्य नाटय़च्या सर्व स्पर्धा 15 जानेवारीपासून सुरू होणार होती. पण या तारखेपासून सुरु होणारी राज्य नाटय़ स्पर्धा शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळवण्यात येत असल्याचे रत्नागिरी केंद्र समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी सांगितले आहे.
ही स्पर्धा 15 जानेवारीपासून निर्धारित तारखांनाच घेण्यात येणार असल्याने रंगकर्मी व रसिकप्रेक्षकांना कोरोना काळात उत्सुकता पसरली होती. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी राज्य नाटय़ स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक संचालनालयाकडे नाटय़कर्मींकडून विचारणादेखील करण्यात येत होती. ही स्पर्धा कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे होणार की नाही याबाबत नाटय़कर्मी व रसिकांसमोर
प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पण 15 जानेवारीपासून स्पर्धेस सुरुवात होणार असल्याचे सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने कळवण्यात आले होते. राज्य नाटय़ स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच कोविडविषयक सर्व नियमावलीचे पालन करून व खबरदारी घेऊन रंगकर्मींनी प्रयोगांचे सादरीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. समाज माध्यमावरील प्रसारित झालेल्या मजकुराच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात आलेल्या निवेदनानुसार 15 जानेवारीपासून दररोज सायंकाळी 6 वाजता येथील स्वा.सावरकर नाटय़गृहात या स्पर्धेची प्राथमिक फेरी प्रारंभ होणार होता.
मात्र कोविडच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य नाटय़ स्पर्धा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेस अनुसरून राज्यनाटय़ स्पर्धा तूर्तास पुढे ढकलण्यात यावी, अशी अनेक संघांनी ई मेल द्वारे व दूरध्वनीवरून विनंती करण्यात आली. ही विनंती लक्षात घेऊन, येत्या 15 जानेवारीपासून सुरु होणारी राज्य नाटय़ स्पर्धा शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळवण्यात येत आहे. हा निर्णय शासनाचा अधिकृत आहे, असे रत्नागिरी केंद्र समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी सांगितले आहे.