महाबली हनुमानाला स्वशक्तीसामर्थ्याची जाणीव होताच, त्याने श्रीरामांसह सर्व वडिलधाऱयांचे आशीर्वाद घेतले. श्रीरामांनी त्याच्याकडे आपल्या ओळखीची खूण म्हणून मुद्रिका सीतेला देण्यासाठी दिली. सर्वसंमतीने त्याने लंकेकडे प्रस्थान केले. वाटेत हनुमानाने सावली पकडणाऱया एका राक्षसीचा, तसेच लंकिनी राक्षसीलाही मारून लंकेत प्रवेश केला. तिथे त्याची भेट बिभीषणाशी झाली. तिथून तो अशोकवाटिकेकडे निघाला. तिथे पोचल्यावर त्याला दिसले की, रावण सीतेला धमकावत होता. पण सीता त्याच्या धमक्मयांना भीक घालत नव्हती. शेवटी तो रागारागाने तिथून निघून गेला. तो निघून गेल्यावर तिथे सीतेच्या भोवती पहाऱयावर असणाऱया अनेक राक्षसींपैकी दयाळू असलेली त्रिजटा राक्षसी तिच्या जवळ आली. तिने सीतेला धीर दिला. थोडावेळ लांबून हे सारे पहात असणारा हनुमान सीतेवरील पहारा थोडा शिथिल झालेला पाहताच, सीता एकांतात असताना तिथे आला. तिला रामाने दिलेली मुद्रिका दिली. सीतेला ती खूण पटली. सीतेला आपल्या सुटकेची आशा वाटू लागली.
हनुमानाला सीतेकडे आलेला पाहून रावणाचा एक पुत्र अक्षय त्याला मारण्यासाठी तिथे आला. पण हनुमानाने त्याचा वध केला. नंतर अशोकवनात तो इकडे तिकडे उडय़ा मारून विध्वंस करू लागला. तेव्हा रावणपुत्र मेघनादाने त्याच्याभोवती नागपाश टाकले आणि त्याला बांधून इतरांच्या मदतीने हनुमानाला रावणाच्या दरबारात आणले. रावणाने त्याला प्रश्न विचारले, तेव्हा हनुमान म्हणाला, अञ्जनायां समुत्पन्नोएहं मारुतस्य औरसः सुतः। हनुमान् नाम वानरः अहं राघवेण प्रेषितः।। मी अंजनीच्या पोटी जन्मलेला वायुचा औरस पुत्र आहे. मी हनुमान नावाचा वानर असून राघवाने (रामाने) मला दूत म्हणून पाठवले आहे, असे त्याने सांगितले. रामाचे नाव ऐकताच रावण अधिकच चिडला. त्याने हनुमानाच्या शेपटीला चिंध्या बांधून, त्यावर तेल ओतून ती पेटवून द्यायला सांगितले. मग काय? हनुमानाने पेटते शेपूट घेऊन लंकेतील भव्य प्रासादांवर, झाडांवर व इतर अनेक इमारतींवर उडय़ा मारायला सुरुवात केली. हे सारे इतक्मया वेगाने होत होते की, सगळीकडे ज्वाळा पेटत होत्या, घरेदारे आगीच्या भक्षस्थानी पडत होती. नागरिक आरडाओरडा करीत आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. सारे बेचिराख करूनच तो थांबला. त्यानंतर तो पुन्हा अशोकवनात सीतेला भेटायला गेला. तो निघताना सीतेने आपला चूडामणि त्याला भेट म्हणून देऊन निरोप दिला. नंतर पुन्हा समुद्र ओलांडून हनुमान परत आला. सर्व वानरवीरांना भेटला आणि सुग्रीवाकडे आला. हनुमानाचा वृत्तान्त ऐकून, त्याचा पराक्रम आणि त्याने पार पाडलेले कार्य पाहून श्रीराम अतिशय प्रसन्न झाले.