श्रीराम दंडकारण्यात रहात असताना तिथे शूर्पणखा… रावणाची बहीण… श्रीरामाला भुलवण्यासाठी सुंदर स्त्रीचे रूप घेऊन आली खरी पण तिथे तिची डाळ शिजली नाही. रामाने तिच्या मागणीला नम्रपणे नकार दिला. त्याने पत्नीपासून दूर असलेल्या लक्ष्मणाकडे बोट दाखवून त्याला विवाहासाठी विचारायला सांगितले आणि लक्ष्मणाने तिचे खरे रूप आणि हेतू ओळखून तिचे नाक, कान कापून तिला परत पाठवले. तेव्हा अपमानित होऊन ती आपल्या भावाकडे गेली. रावण तर राजा होता, त्याला शूर्पणखेकडे लक्ष देण्याइतका वेळ नव्हता. बिभीषण सात्विक वृत्तीचा, कुंभकर्ण व्यसनी आणि झोपाळू. त्यांच्याकडून तिच्या अपमानाचा बदला घेण्याची शक्मयता नव्हती. शेवटी ती खर आणि दूषण या भावांकडे गेली. त्या दोघांना अपमानाचा बदला घ्यायला सांगितले. तेव्हा ते दोघेही राम-लक्ष्मणांवर चौदा हजार राक्षस सैन्यासह हल्ला करून गेले. ते दोघेच आणि एवढे अफाट राक्षसी सैन्य यांची तुलनाच होऊ शकत नव्हती. सूडाने पेटून उठलेले उन्मत्त राक्षस रामलक्ष्मणांचा घास करायला टपले होते. त्यांच्या अक्राळविक्राळ देहापुढे ते दोघे सुकुमार भाऊ अगदीच किरकोळ दिसत होते. चौदा हजार राक्षसी सैन्यासमोर कवच परिधान करून एकटा श्रीराम निश्चयाने उभा राहिला. दंडकारण्यात अगस्त्य मुनींच्या आश्रमात रहात असताना त्यांनी अनेक शास्त्रविद्यांचे शिक्षण घेतले होते. त्यांचा निरोप घेताना अगस्त्य ऋषींनी त्यांना दोन अक्षय भाते….ज्यातील बाण कधीच संपणार नाहीत आणि जे अचूकपणे लक्ष्याचा भेद करतील….भेट दिले होते. शिवाय एक सोन्याची तलवार सोन्याच्या म्यानासकट भेट दिली होती. म्हणजे दोन्हीही प्रत्यक्ष दैवी भेटी होत्या. त्या निष्प्रभ कशा होणार?
श्रीरामांनी एकवार सर्व सैन्यांवर नजर टाकली. इकडे खर आपल्या सैन्याच्या वेढय़ात रामांवर विविध शक्ती सोडत होता. त्यामुळे रामांच्या शरीरालाही अनेक जखमा होत होत्या. रामानीही अत्यंत प्रुद्ध होऊन गर्जना केली. आपले धनुष्य अशा तऱहेने ताणले की, ते गोलाकार दिसू लागले. त्यावर हजारो बाण चढवून रामांनी एकाच वेळी हजारो राक्षसी सैन्यावर हल्ला चढवला. अशा प्रकारे सर्व सैन्याला पाणी पाजून खर आणि दूषण या दोन्हीही भावांना त्यांचे मर्म ओळखून वर्मी बाण मारून धराशायी केले. अखेर एकटय़ा श्रीरामांनी या राक्षसी सैन्याचा निःपात केला आणि त्यांच्यापासून होणाऱया उपद्रवापासून सर्व ऋषिमुनींची सुटका केली. हे पाहून आकाशात देवदेवतांनी विमानातून गर्दी करून रामावर पुष्पवृष्टी केली आणि त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली. ऋषिमुनी आता यापुढे आपले तपस्वी जीवन शांततेत व्यतीत करू शकणार होते. त्यासाठी त्यांनी श्रीरामाचे मनापासून आभार मानून त्यांना आशीर्वाद दिले.