सीतेचा लाडिक हट्ट पुरवण्यासाठी राम नाईलाजाने त्या स्वर्णमृगाच्या पाठी गेले. त्यांना वनात जाऊन बराच वेळ झाला तरी अजून का परत येत नाहीत, या विचाराने सीतेला काळजी वाटू लागली. श्रीराम जंगलातील अगदी आतल्या भागात हरणाच्या मागे पोचले होते. त्यांना वाटले आता हे हरिण आपल्या बाणाच्या आवाक्मयात आले आहे. त्यांनी त्याला मारण्यासाठी बाण सज्ज केला. हरिणावर सोडला. तो मारिचाला लागला. रावणाच्या सूचनेनुसार तो रामाचा आवाज काढून ओरडू लागला, ‘लक्ष्मणा, धाव, धाव! लक्ष्मणा,…….सीता…सीता..’ श्रीरामाचा असा व्याकूळ आवाज सीतेच्या कानी पडल्यावर ती लक्ष्मणाला म्हणाली, ‘लक्ष्मणा, तुझा भाऊ संकटात सापडलेला दिसतो. तू त्याच्या मदतीला जायला हवं.’ त्यावर लक्ष्मण म्हणाला, ‘वहिनी, माझ्या बंधूवर कोणतेही संकट आलेले नाही. मला वाटते की, ही कोणतीतरी मायावी शक्ती आपल्याला फसवते आहे. तू काळजी करू नकोस. तो त्याचा नाश करून नक्की परत येईल.’ लक्ष्मण रामाच्या सहाय्याला धावून जात नाही, हे पाहून सीता क्रोधित झाली आणि ती त्याला अद्वातद्वा बोलू लागली. त्याचे वर्णन महाकवी वाल्मिकींनी कसे केले आहे ते पहा! तमुवाच ततस्तत्र क्षुभिता जनकात्मजा। सौमित्रे मित्ररूपेण भ्रातुः त्वमसि शत्रूवत्।। यस्त्वमस्यामवस्थायां भ्रातरं नाभिपद्यसे। इच्छसि त्वं विनशन्तं रामं लक्ष्मण मत्कृते।।। अर्थः-तेव्हा अत्यंत क्षुब्ध झालेली ती जनककन्या(सीता) त्याला(लक्ष्मणाला) म्हणाली, ‘हे सौमित्रा, मित्ररूपात असलेला तू तुझ्या भावाचा शत्रू आहेस. कारण तू या परिस्थितीत असलेल्या भावाच्या सहाय्याला जात नाहीस. तुझ्या मनात माझ्याविषयी लालसा असल्याने तू आपल्या भावाचा नाश होऊ इच्छितोस’ इतक्मया टोकाचे आरोप सीता लक्ष्मणावर करू लागली तरी लक्ष्मण आपला संयम न सोडता तिची समजूत घालण्याचा तो प्रयत्न करू लागला. तो म्हणाला, ‘हे वैदेही, तू चिंता करू नकोस. या विशाल वनात राहणाऱया राक्षस इ. चे हिंसा हे मनोरंजनाचे साधन आहे. ते असे वेगवेगळे आवाज काढत असतात.’ तेव्हा तर सीता इतकी संतापली की, तिचे डोळे रागाने लाल झाले. ती सत्यवादी लक्ष्मणावर कटुशब्दांचे वाग्बाण सोडू लागली. इतके झाल्यानंतर दोन्ही हात जोडून नतमस्तक होत लक्ष्मणाने सीतेला प्रणाम केला आणि चिंतित होऊन वारंवार तिच्याकडे पहात तो रामाकडे वनात जायला निघाला.
इथे एक गोष्ट लक्षात येते की, सीतेने तिला समजावण्यासाठी लक्ष्मणाला संधीच दिलेली नाही. त्यामुळे लक्ष्मण कुटीभोवती ‘लक्ष्मणरेखा’ आखून सीतेला सावध करून निघून गेला, ही नेहमी सांगितली जाणारी कल्पित कथा मूळ वाल्मिकी रामायणात आपल्याला सापडत नाही.