मुंबई/ प्रतिनिधी
दरम्यान, इंधन दरवाढीमुळे इतर वस्तूंचीही भाववाढ झाल्याने ऐन सणासुदीत ग्राहकांना महागाईस सामोरे जावे लागत आहे. त्यावरून काँग्रेससह विरोधकांनी केंद्रातील भाजप सरकारला सातत्याने लक्ष्य केले. लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत काही ठिकाणी सत्ताधारी भाजपाला पराभवाचा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पेट्रोलदरात पाच रुपयांची, तर डिझेलदरात दहा रुपयांची कपात होणार आहे. यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
इंधनढीसंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. काल केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर क्रमश: पाच आणि दहा रुपयांनी कमी करुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोटनिवडणुकीतल्या पराभवामुळे पेट्रोलचे दर कमी केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारला चिमटे काढत त्यांनी म्हटलंय की, पेट्रोलचे दर 50 रुपयांनी कमी करायचे असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव करावा लागेल.
राऊत यांनी बोलताना “मन मोठं असण्यासाठी आधी मन असावे लागते. आम्हाला पाच रुपयांची नोट दाखवत आहात. किमान २५ रुपये इंधन कपात कराला हवी होती आणि त्यानंतर ५० रुपये. १०० रुपये वाढवायचे आणि पाच रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन? मग दरवाढ केली हे सुद्धा मन मोठे असण्याचे लक्षण आहे का? ज्यांचे मन कठोर आहे तेच पेट्रोल डिझेलचे दर वाढवू शकतात. पेट्रोल पंपावर लोक मोदींकडे बघतात मग मोदी त्यांना आम्हाला मत दिल्याची किंमत चुकवा असा आशिर्वाद देतात. २०२४ साली हेही दिवस जातील,” असे संजय राऊत यांनी म्हटले.