१०१ व्या वर्षीही त्यांना ना शुगर, ना बी.पी., ना सांधेदुखी असा कोणताच त्रास नाही
कसलीही गोळी चालू नाही… गावकऱ्यांच्या कौतुकाचा ठरताहेत विषय…
शरद माने / वाळवा
विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी माणसाचे आयुष्यमान सरासरी आयुष्यमान तसे कमीच म्हणजे ६० वर्षांपर्यंतच आहे परंतु, आजच्या काळात एखादी व्यक्ती शंभर वर्षे आयुष्य जगत असेल, तर ही गोष्ट कौतुकाचा व कुतुहलाचा विषय बनते. अशीच कौतुकाची गोष्ट वाळवा गावातील हाळ भागातील फुलाबाई परशुराम भोई (वय वर्षे १०१) चर्चेचा विषय ठरलेली आहे.
फुलाबाई परशुराम भाई या आजींची तब्बेत वयाच्या शंभरी नंतरही सर्वोत्तम आहे. एकंदरीतच काय तर देव एखाद्या व्यक्तीला भरभरून दीर्घायुष्य देतो ते भाग्य फुलाबाई यांना लाभल आहे. फुलाबाई भोई यांना कसलीही गोळी चालू नाही, कोणताही आजार नाही, ना शुगर, ना बी.पी., ना सांधे दुखी असा कोणताच त्रास त्यांना नाही. अगदी नवागता सारखं त्यांचे राहणीमान पाहून प्रत्येकाला त्यांच्याविषयी कुतुहल वाटत आहे. हे विषेश आहे आणि म्हणुनच त्यांचं समाजाला कौतुक वाटतं
फुलाबाई या १०१ व्या वर्षी सुद्धा स्वतःचे सर्व कामकाज स्वतः करतात. त्यांना स्पष्टपणे डोळ्यांनी दिसते. कितीही जुना व्यक्ती समोर आला तर त्यांना त्या अगदी सहज ओळखतात. कानाने देखील त्यांना चांगले ऐकू येते. त्यांचे बोलण्यातील उच्चार देखील सुस्पष्ट आहेत. तोंडातील दात सुद्धा थोडे पडले असले तरी शंभराव्या वर्षी सुद्धा कोणताही पदार्थ त्या खाऊ शकतात. शंभराव्या वर्षीही त्यांची प्रकृती उत्तम साथ देत असून, त्यांच्या जीवन शैलीचे सर्वांना कौतुक व कुतुहल वाटते.