मुंबई / ऑनलाईन टीम
कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना ११ एप्रिल रोजी होणार एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी दीडच्या सुमारास बोलावलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा नंतर कधी घेतल्या जातील, त्याविषयी देखील निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल, असं देखील या बैठकीत ठरल्याचं सांगितलं जात आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच खासदार नवनीत राणा यांनी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
या निर्णयाविषयी जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “विद्यार्थी घाबरले आहेत. पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. विद्यार्थ्यांमध्ये त्याची अस्वस्थता होती. संवेदनाशील मुख्यमंत्री आणि इतर मंत्री हा निर्णय घेतील आणि परीक्षा पुढे ढकलतील याची मला खात्री होती. आता तो निर्णय झाला त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो”, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, सर्वच स्तरातून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात असल्यामुळे या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी तातडीची ऑनलाईन बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.