नवी/दिल्ली /प्रतिनिधी
देशाचा रविवारी ७५ वा स्वातंत्र्य दिन. संपूर्ण देशभरात भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन उद्या मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनावाच्या एक दिवस आधी एक महत्वाची घोषणा केली आहे. त्यांनी फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असं सांगत इथूनपुढे देशात १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ (विभाजन विभीषिका स्मृति दिवस) म्हणून ओळखला जाईल असं सांगितलं आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू-भगिनींना यामुळे स्थलांतरित व्हावं लागलं आणि काहींना तर आपला जीवही गमवावा लागला. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाची आठवण म्हणून देशात १४ ऑगस्टला ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे”.