प्रतिनिधी / सांगली
रेबीज हा अत्यंत घातक आणि भीतीदायक असा विषाणूजन्य रोग हजारो वर्षापासून सर्व जगाला घाबरवून टाकत आहे. पण याचे उच्चाटन आपल्याला सन २०३० पर्यंत करावयाचे आहे आणि ते शक्य आहे असे प्रतिपादन डॉ. विजय ढोके, पशुधन विकास अधिकारी मिरज यांनी केले. क्रॉस वेल्फेअर फौंडेशन सांगली आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व पशुपालक आणि पशुवैद्यक यांच्यासाठी आयोजित वेबीनार मध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
डॉ. ढोके पुढे म्हणाले, जगात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांपासूनच या रोगाचा प्रसार होतो. जगातील सर्वात गंभीर असा हा प्राणीजन्य आजार आहे. कुत्र्याबरोबरच मांजर, कोल्हे, वटवाघूळ यासह ज्या प्राण्यांना त्यांच्याकडून चावे होतात ते सर्व या रोगामुळे संक्रमित होतात. जगात जवळजवळ दरवर्षी ७० हजार लोक या रोगामुळे मृत्युमुखी पडतात. भारतात प्रतिवर्षी २० हजार लोकांना याची लागण होते आणि शेवट मृत्यूने होतो. लुई पाश्चर यांच्या सन १८८५ मधील या रोगाच्या प्रतिबंधक लसीच्या संशोधनानंतर मात्र अमेरिका सारख्या देशांनी मानवातील मृत्यूचे प्रमाण प्रतिवर्षी दोन पर्यंत खाली आणले आहे. एकूणच हा जगातील सातव्या क्रमांकावरील संसर्गजन्य आजार आहे.
वेबीनारच्या अध्यक्ष पदावरून बोलताना डॉ. संतोष पंचपोर प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन पुणे यांनी सांगितले की, रेबीजची लागण झाल्यावर मृत्यू हा ठरलेला आहे. रेबीज लस व इम्युनोग्लोब्युलीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून देखील आजही आपण या रोगावर नियंत्रण मिळवू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी सर्व स्तरावर प्रामाणिक प्रयत्नाची गरज आहे. एकूणच रेबीजविषयी रोगउत्पत्ती, निदान, प्रतिबंध त्याचबरोबर नियंत्रण याविषयी वारंवार समाजमाध्यमावर चर्चा होणे आवश्यक आहे.
राज्यातील महानगरपालिका, मोठ्या नगरपालिका सुद्धा आजही कुत्र्यांच्या निर्बीजीकरण याबाबत किती उदासीन आहेत हे आपण पाहतो. त्याचबरोबर सर्वच ठिकाणी आरोग्य विभागात रेबीज रोगाविषयी एकूणच उदासिनता ही काळजी वाढवणारी आहे. अशा संवेदनशील विषयावर वेबीनार आयोजित केल्याबद्दल त्यांनी ब्ल्यू क्रॉस वेल्फेअर फौंडेशन सांगली आणि शेकरू फाउंडेशन यांना धन्यवाद दिले.
डॉ. व्यंकटराव घोरपडे, अध्यक्ष ब्ल्यू क्रॉस वेल्फेअर फौंडेशन सांगली यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतान नियमित कुत्र्याचें रेबीज रोग प्रतिबंधक लसीकरण त्याचबरोबर जिल्हास्तरावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी, शासनाचे आरोग्य अधिकारी, खासगी वैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करणे देखील महत्त्वाचे आहे. जगातील काही देश या रोगापासून मुक्त झाले आहेत. आपण देखील नियमित पणे प्रभावी लोकशिक्षण, लसीकरण आणि त्यासाठी शासनाची भक्कम साथ मिळाली तर निश्चितपणे रोग मुक्त होऊ यात शंका नाही. असे प्रतिपादन केले. डॉ.सचिन वंजारी, इस्लामपूर यांनी पशुपालक आणि पशुवैद्यक यांच्या प्रश्नोत्तराचे नियोजन केले व आभारप्रदर्शन केले.