कोल्हापूर : प्रतिनिधी
गेल्या दहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. हा संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने अनेक प्रयत्न केले. मात्र त्याला अपयश येत असल्याचे चित्र आहे. मात्र आता राज्य सरकार रोजंदारीवर काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर उठले आहे. येत्या 24 तासात कामावर हजर राहावे अन्यथा कार्यमुक्त करू असे आदेश दिले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात 40 रोजंदारी कर्मचाऱ्यांना अशा नोटीस मिळाल्या असून या नोटीसा विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी बजावल्या आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.