प्रतिनिधी / कोल्हापूर
देशामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कोल्हापूर मध्ये दि. २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू लागू झाला होता. त्यावेळी जिल्ह्यातील सर्व उद्योगधंदे बंद होते. त्याचदिवशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण जिल्हाधिकारी कार्यालय यांचा आदेश- कोरोना विषाणू- ७३६/२०२० दि. २२/०३/२०२० नुसार कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण उद्योग आणि व्यवसाय दि. १४ एप्रिल २०२० पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशामध्ये वाढ करुन तो दि. ३ मे २०२० पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग आणि व्यापार दि. २२ मार्च २०२० पासून बंद आहेत.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या संलग्न व्यापारी व उद्योजक संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाने १ मे २०२० रोजी काढलेल्या परिपत्रक क्र. ४०-३/२०२०-डीएम-आय (ए) प्रमाणे व्यापार, उद्योग व व्यवसाय सुरु करण्यास मुभा मिळावी, त्याचबरोबर एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरु आहेत त्या धर्तीवर उद्यमनगर, पांजरपोळ व वाय. पी. पोवार नगर येथील उद्योग सुरु करणेसाठी परवानगी मिळावी याबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अजून महाराष्ट्र शासनाचे या संबंधीचे परिपत्रक प्राप्त झालेले नाही. महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक प्राप्त झाल्यानंतर त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले. या वेळी चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष संजय पाटील, संचालक अजित कोठारी, जुगल आदी उपस्थित होते.