नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
राज्यसभेत बुधवारी पेगॅसस प्रकरणी विरोधकांनी जोरदार गोंधळा घातला. यासोबतच १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या चर्चेवरुन जोरदार गोंधळ निर्माण झाला होता. काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर प्रमुख विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याचवेळी वेलमध्ये उतरुन निदर्शने करत असताना मार्शल्सनी महिला खासदारांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी देखील महिला खासदारांसोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करत माझ्या ५५ वर्षांच्या करिअरमध्ये मी असं कधी पाहिलेलं नाही, असं बोलून घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेत महिला खासदारांवर हल्ला झाल्याचं सांगताना आपण आपल्या ५५ वर्षांच्या संसदीय करिअरमध्ये असं कधीचं पाहिलं नसल्याचं म्हटलं. “संसदेतील माझ्या ५५ वर्षांच्या करिअरमध्ये (राज्यसभा) महिला खासदारांवर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला तसं कधीच पाहिलेलं नाही. सभागृहात बाहेरुन ४० पुरुष आणि महिलांना आणण्यात आलं. हे वेदनादायी असून लोकशाहीवर हल्ला आहे. सभागहात हे योग्य झालं नाही,” असं शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान दुसरीकडे काँग्रेसच्या महिला खासदारांना सरकार आणि मार्शल्सवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
राज्यसभेती विरोधी पक्षनेता मल्लिकार्जून खरगे यांनी देखील महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महिला सदस्यांसोबत धक्काबुक्की करत अपमान केल्याचा आरोप केला आहे. विरोधी पक्षातील सदस्य विरोध प्रदर्शन करण्यासाठी आसनाजवळ जातात तेव्हा त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून घेरलं जातं असा देखील आरोप खरगे यांनी केला. हा संसदेचा आणि लोकशाहीचा अपमान असल्याची टीका खरगेंनी केली आहे.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधक खोटं पसरवत आहे.. उलट विरोधी सदस्यांनी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली, असा आरोप जोशी यांनी केला. तसंच सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केलं जावं अशी सभापतींकडे विनंती केल्याचं सांगितलं आहे.