ऑनलाईन टीम / पुणे :
महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा क्षेत्रात एक परंपरा निर्माण केली होती. ॲड. भास्करराव आव्हाड हे याच परंपरेचे पाईक होते, असे मत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
येथील आडकर फौंडेशनतर्फे देण्यात येणारा पहिला ॲड. भास्करराव आव्हाड स्मृति पुरस्कार ज्येष्ठ व्याख्याते, निरूपणकार रसिकराज उल्हासदादा पवार यांना मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, टिळक आणि महात्मा गांधी यांच्या कार्यात तत्व आणि आध्यात्म यांची जी सरमिसळ होती, तीच सरमिसळ आव्हाडांच्या वकीली कारकीर्दीत आढळून येते. ॲड. आव्हाड हे कायदा क्षेत्रातील सळसळते व्यक्तिमत्व होते. त्यांनी वकीली क्षेत्रात येणाऱ्या पुढील पिढ्यांसमोर दीपस्तंभासारखे काम करून ठेवले आहे. मुत्सद्दी विचारवंत आणि नैतिकता पाळणारे तत्वज्ञ असे त्यांचे थोडक्यात वर्णन करता येईल.
यावेळी पुरस्काराला उत्तर देताना उल्हासदादा पवार म्हणाले की, वकीली क्षेत्रात कार्य करीत असताना मतभिन्नता होत असते. पण त्याविषयीचे क्लेष किंवा उव्दिग्नता आव्हाड यांनी त्यांच्या मनात कधीच बाळगली नाही. त्यांच्याशी कोणाचे मतभेद झाले असले तरीही त्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिकाच त्यांनी ठेवली. कारण मूळात ते शिक्षक होते आणि ज्ञानदान हे सगळ्यात मोठे दान आहे, यावर विश्वास ठेवून त्यांनी कायमच इतरांना ज्ञानमार्ग दाखवण्याचे काम केले. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले.