रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ सातारा
लॉकडाऊन हा विषय आपणास किंवा नागरिकांस नवीन नाही. याचे काय परिणाम झाले आहेत, हे देखील आपणास माहित आहे. या लॉकडाऊनमुळे खरोखरीच रुग्णसंख्या आटोक्यात आणली आहे काय, याचा कोणीच विचार केलेला दिसत नाही. केवळ ‘कोरोना’ ला महामारी किंवा साथरोग घोषित करून अनागोंदी सुरु आहे आणि यास प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण जबाबदार आहात. ‘कायदा आणि सुव्यवस्था’ राखण्यासाठी कोरोनाला ‘आपत्ती’ समजून आपण लॉकडाऊन जाहीर केला आहे, त्यामुळे 1 जुन पासुन सातारा जिल्हय़ातील लॉकडाऊन त्वरीत रद्द करावे, याबाबतचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ (ए) सातारा शहर अध्यक्ष जयवंत शिवदास कांबळे यांनी दिले.
तसेच महाराष्ट्रातील जनता सूज्ञ आहे, कोरोना आजाराविषयी भरभरून वाचल्याने नागरिकांचा एक दिवसही या विषयाखेरीज जात नाही, तेथे मुद्दामहून नागरिकांना दुकाने बंद करायला लावून आणि त्यांची वाहने जप्त करून, काय साध्य केले जात आहे, असा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित होत आहे. या लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांचे झालेले हाल, आपल्याला सरकारी अधिकाऱयाच्या ऐषोआरामात असल्याने जाणवलेले नाही, हे स्पष्ट दिसून येते. जेथे हातावर पोट असणारे भाजीविक्रेते, किरकोळ दुकानदार, फिरते विक्रेते, कामगार आपली सरकारी-पालिका गाडी आली कि जीव मुठीत घेवून पळतात, आणि पालिकेची गाडी आल्यावर जेथे भाजी हिसकावून घेवून जप्त केली जाते, तेथे आपण कोणती ‘कायदा-सुव्यवस्था’ राखत आहात? जसे रोज किती रुग्णसंख्या आहे, हे प्रकाशित करता तसे जिह्यातील कोरोना सेंटर/ हॉस्पिटल मध्ये आज सरकारने किती खर्च केला, त्याचे आकडे का प्रसिद्ध केले जात नाहीत. लॉकडाऊनमुळे जनता मृतवत झाल्याने तुम्हाला प्रशासन कसे चालवायचे, अशी गंभीर वेळ येईल. लोकांचा अंत पाहू नका आणि लोकांना कायदा हातात घ्यायला लावू नका, असे यानिवेदनाद्वारे सांगण्यात आले.